कारंजातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 05:00 AM2020-10-17T05:00:00+5:302020-10-17T05:00:07+5:30
नोव्हेंबरमध्ये नगरपंचायतची निवडणूक होऊ घातली आहे. यापूर्वी कारंजा नगरपंचायत झाल्यानंतर काँग्रेसची एक हाती सत्ता नगरपंचायतवर होती. १७ पैकी १५ नगरसेवक काँग्रेसचे, तर दोन भाजपचे होते. सध्या संपूर्ण शहरामध्ये निवडणुकीचे जोरदार चर्चा असताना जनतेमध्ये मात्र संतप्त भावना असून पहिल्यांदा आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा व नंतरच आमच्याकडे मते मागायला या, असे मतदार काँग्रेस व भाजपा या दोन्ही राजकीय पुढाऱ्यांना ठासून सांगणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घाडगे) : तालुका व विशेषतः शहर पाणी समस्येसाठी जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. पाण्याची गंभीर समस्या असताना कोणत्याही राजकीय पुढाऱ्याने दीर्घकालीन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळेच ही शेकडो वर्षांची समस्या कायम आहे.
१९९८ मध्ये कार नदीवर धरण बांधण्यात आले. पाण्याची समस्या कायम सुटेल असा, आशावाद कारंजावासीयांना वाटू लागला होता. अनेकांची सत्ता आल्या आणि गेली. मात्र, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी कोणीही सोडवू शकले नाही. मध्यंतरीच्या काळात खैरी धरण येथून जलवाहिनीद्वारे कारंजा शहरामध्ये व तालुक्यात नारा २२ योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ती पाईपलाईन इतकी सदोष होती की वारंवार त्या पाईपलाईन मध्ये समस्या निर्माण होऊन जलसंकट गडद होत होते. आजही कारंजा शहराला कधी ५ तर कधी सहा दिवसानंतर पाणीपुरवठा होतो. जलवाहिनी फुटली फुटली आठ दिवसपर्यंत पाणीपुरवठा होत नाही. याकडे कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांची लक्ष नाही. त्यांची अनास्था कायम आहे.
नोव्हेंबरमध्ये नगरपंचायतची निवडणूक होऊ घातली आहे. यापूर्वी कारंजा नगरपंचायत झाल्यानंतर काँग्रेसची एक हाती सत्ता नगरपंचायतवर होती. १७ पैकी १५ नगरसेवक काँग्रेसचे, तर दोन भाजपचे होते. सध्या संपूर्ण शहरामध्ये निवडणुकीचे जोरदार चर्चा असताना जनतेमध्ये मात्र संतप्त भावना असून पहिल्यांदा आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा व नंतरच आमच्याकडे मते मागायला या, असे मतदार काँग्रेस व भाजपा या दोन्ही राजकीय पुढाऱ्यांना ठासून सांगणार आहेत.
वाढीव पाणीपुरवठा योजनेद्वारे खैरी धरणावरून जलशुद्धीकरण करून कारंजा शहरात पाणी आणण्यात येईल येईल व दररोज शहरवासीयांना पाणीपुरवठा कसा होईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
-दादाराव केचे, आमदार, आर्वी विधानसभा.
कारंजा शहराचा पाणीप्रश्न पूर्णपणे मार्गी लागलेला असून केवळ मंजुरीसाठी अडकलेला आहे. त्यासाठी माजी आमदार अमर काळे व पालकमंत्री सुनील केदार तयारीला लागलेले आहेत. निवडणुकीपूर्वी हा पाणीपुरवठा मंजुरीचा प्रश्न मार्गी लावला जाईल.
-कल्पना मस्की, नगराध्यक्ष, नगरपंचायत, कारंजा.