रेल्वेस्थानकांवर स्क्रिनिंग नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 05:00 AM2020-03-15T05:00:00+5:302020-03-15T05:00:01+5:30
अनेक देशांनी नागरिकांना सतर्क राहण्याच्या तसेच गरजेशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. नागरिकही त्याला दाद देत आहेत. आपल्याकडे मात्र, प्रशासन बिनधास्त आणि नागरिक निश्चिंत अशी काहीशी स्थिती आहे. सेवाग्राम येथील रूग्णालयात एका संशयिताला दाखल करण्यात आले आहे. त्याच्या रक्ताच्या नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जीवघेणा ठरणाऱ्या कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासह संशयित रुग्णांना तातडीने उपचार देण्यासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न होत आले तरी वर्धा आणि सेवाग्राम येथील रेल्वेस्थानकांवर स्क्रिनिंग होत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. विशेष म्हणजे, गर्दीच्या ठिकाणी या व्हायरसचा झपाट्याने प्रसार होत असून कोरोनाला अटकाव घालण्यासाठी वर्ध्यात हलगर्जी तर होत नाही ना, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
अनेक देशांनी नागरिकांना सतर्क राहण्याच्या तसेच गरजेशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. नागरिकही त्याला दाद देत आहेत. आपल्याकडे मात्र, प्रशासन बिनधास्त आणि नागरिक निश्चिंत अशी काहीशी स्थिती आहे. सेवाग्राम येथील रूग्णालयात एका संशयिताला दाखल करण्यात आले आहे. त्याच्या रक्ताच्या नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे अधिकच खबरदारी घेण्याची गरज आहे. काही मंदिरांमध्ये दर्शनापूर्वी सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्याची सक्ती करण्यात आली आहे. तर सतत २० ते २५ हजार प्रवाशांचा राबता असणाºया रेल्वे स्थानकावर मात्र कोणत्याच उपाययोजना नसल्याचे चित्र आहे. एखादा विषाणूबाधित रुग्ण गर्दीत शिरल्यास हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्ध्यातील बापूकुटी, शांतीस्तूप, बोर व्याघ्र प्रकल्प या पर्यटनस्थळी देश-विदेशातील नागरिक भेटी देतात. मात्र, रेल्वेस्थानकांवर कुठलीही स्क्रिनिंग होत नसल्याने कोरोनाला आमंत्रणच मिळत आहे. गर्दीत खोकलणे, शिंकणे कुठेही थुंकणे हा प्रकार सर्रास सुरू आहे. इतकेच नव्हे, तर रेल्वेस्थानकांवर नियमित डॉक्टरही नसतो. प्रवाशाने स्वत: आजाराची ओळख पटवून सूचना द्यावी, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे. रेल्वेस्थानकाकडून पोस्टर्स आणि ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. असे असले तरी अद्याप कोरोनाची लागण झालेला एकही पॉझिटिव्ह रुग्ण वर्धा जिल्ह्यात आढळलेला नाही.
बसस्थानकावरही प्रभावी उपाययोजना नाहीच
रेल्वेस्थानकाहून अधिक गंभीर परिस्थिती बसस्थानकावर आहे. बसस्थानकात काय बसमध्येही मोठी गर्दी असते; पण, तेथेही कोणतीच उपाययोजना केलेली दिसून आली नाही. स्वच्छतेचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. प्रवाशांच्या जनजागृतीचे कोणतेच उपाय बसस्थानक, रेल्वेस्थानकावर दिसून येत नाहीत.
तिकीट केंद्रावरील गर्दी ओसरली
सर्वाधिक स्वस्त पर्याय असल्याने रेल्वेगाड्यांमधील गर्दी कायम आहे. तसेच कोरोना विषाणूच्या धास्तीमुळे रेल्वेस्थानकावरील तिकीट केंद्रावरील गर्दी ओसरल्याचे चित्र असून अनेक प्रवाशांचा आॅनलाईन तिकीट काढण्याकडे कल वाढला आहे.