चैतन्य जोशीलाेकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सायबर गुन्हेगार अनेकांच्या खात्यातून लाखो रुपये परस्पर काढून घेत आहेत. 'बँकेतून बोलतो, पेटीएमची केवायसी करुन देतो, एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे' आदी अनेक फंडे सायबर गुन्हेगार वापरुन नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढतात. महागडे स्मार्ट फोन वापरकर्त्यांना सायबर गुन्हेगार गंडवित आहेत. बतावणी करणाऱ्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस विभाग नेहमी करत असतानाही उच्चशिक्षीत महिला व पुरषांची ऑनलाईन फसवणूक होत आहे. जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत सायबर भामट्यांनी ६७ व्यक्तींची तब्बल ४० लाख ९१ हजार ४६१ रुपयांनी ऑनलाईन फसवणूक केल्याचे पुढे आले आहे. यापैकी १० गुन्ह्यांची उकल करुन ३ लाख ५० हजार रुपये परत आणण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक कर्यालयातील सायबर सेलला यश आले आहे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर २३ मार्चपासून लॉकडाऊन घोषीत करण्यात आला. अनेकांच्या हाताची कामे गेली. त्यामुळे सर्व जण घरातच होते. त्यामुळे सायबर भामट्यांनी डोकेवर काढले. एटीएम फ्रॉड, ईमेलवरुन फसवणूक आदी विविध प्रकारे भामट्यांनी नागरिकांची लाखो रुपयांनी फसवणूक केली. त्यामुळे अनेकांनी फसवणूक होताच सायबर सेल गाठून तक्रार दाखल केली. माहिती तंत्रज्ञान कायद्यांअंतर्गत सोशल मीडिया व ई मेलवरुनही फसवणूक करण्यात आली. डेबीट, क्रेडीट कर्डाद्वारे देखीलही फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. तसेच इतर प्रकारे २६ व्यक्तींची ऑनलाईनद्वारे फसवणूक करण्यात आली आहे. आधीच लॉकडाऊनमुळे हाताचे काम गेलेल्या नागरिकांच्या बँक खात्यावर सायबर गुन्हेगारांनी दरोडा टाकल्याने मोठे संकट कोसळले. मात्र, सायबर सेलचे दिनेश बोथकर, अक्षय राऊत, नीलेश कट्टोजवार, अनुप कावळे यांच्या अथक प्रयत्नाने १० गुन्हे उघडीस आणण्यात यश आले असून पुढील गुन्ह्यांचा तपास सुरु आहे.
एटीएम फ्रॉडचे १३ गुन्हे
एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे. बदलावे लागेल, तुमचे कार्ड बदलिवण्यासाठी ओटीपी क्रमांक सांगा, असा फेक कॉल भामट्याकडून येतो, काही शिक्षीत, उच्च शिक्षीत नागरिक विश्वास ठेवून ओटीपी देतात. आणि मग, लगेच बँक खात्यातून परस्पर पैसे काढून घेत फसवणूक केली जाते. असे तब्ब्ल १३ गुन्हे दाखल झाले आहे.
सोशल मीडियावर २१ व्यक्तींची फसगत फेसबूक आणि व्हॉट्सअपवरुन मुलींचा छळ, तसेच फोटो व्हायरल करणे, फेसबूक हॅक करणे, बनावट अकाऊंट तयार करुन फसवणूक करण्याच्या २१ तक्रारी दाखल झाल्या आहेत.