पैशाच्या वादातून भीमनगरात थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 06:00 AM2019-09-21T06:00:00+5:302019-09-21T06:00:11+5:30
आरोपी राजेश यादव व एका अल्पवयीन आरोपीने मृत आशीषचा भाऊ प्रणलचा मित्र विपुल तेलंग याच्या घराची साफसफाई करण्याचे काम घेतले होते. त्याकरिता विपुलकडून पाचशे रुपये अॅडव्हान्स घेऊन तो आशीषकडे ठेवायला दिला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सावंगी मार्गालगतच्या भीमनगर परिसरात पाचशे रुपयांच्या वादातून एकाच परिवारातील बापलेकांवर चायनिज चाकूने हल्ला करण्यात आला. यात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर बापलेक जखमी झाले आहे. हा थरार गुरुवारी रात्री सव्वानऊ वाजतादरम्यान घडला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन आरोपीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघेही फ रार आहेत.
आशीष अनिल भगत (२३) रा. भीमनगर असे मृताचे नाव आहे. तर त्याचे वडील अनिल कचरु भगत (४९) व भाऊ प्रणल अनिल भगत (२१) हे दोघेही जखमी झाले आहे. यातील आरोपी राजेश यादव व एका अल्पवयीन आरोपीने मृत आशीषचा भाऊ प्रणलचा मित्र विपुल तेलंग याच्या घराची साफसफाई करण्याचे काम घेतले होते. त्याकरिता विपुलकडून पाचशे रुपये अॅडव्हान्स घेऊन तो आशीषकडे ठेवायला दिला होता. ठरल्याप्रमाणे आरोपींनी खोलीची साफसफाई केली नसल्यामुळे आशीषने पाचशे रुपये देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या आरोपींनी आशीषसोबत वाद घालत चायनिज चाकूने पोटावर सपासप वार केले. यात आशीष गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. त्याला सोडविण्यासाठी धावलेले त्याचे वडील अनिल व लहान भाऊ प्रणल यांच्यावरही काठीने हल्ला चढविल्याने ते दोघेही जखमी झाले. याप्रकरणी मृताचे वडील अनिल भगत यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपी राजेश यादव रा.भीमनगर व आणखी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे दोन्ही आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.