लॅाकडाऊन काळातील वाढीव विद्यूत देयकाविरुद्ध ‘मनसे’ चा जनआक्रोश मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 05:00 AM2020-11-27T05:00:00+5:302020-11-27T05:00:14+5:30
१ एप्रिलपासून वीज दरवाढीचा महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने वीज ग्राहकांना चांगलाच शॉक दिला. लॉकडाऊनच्या काळात बेरोजगारी वाढल्याने जनता होरपळून निघाली. सामान्यांच्या हाताला काम नसल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. अशातच भरमसाठ देयक दिल्याने कुटुंबाला जगवावं की वीज देयक भरावं, असा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. आधी शंभर युनिटपर्यंत वीज देयकामध्ये सवलत देण्याचे आश्वासन देणाऱ्या ऊर्जा मंत्र्यांनी आता घुमजाव करुन वीज देयक भरलेच पाहीजे, अशी भाषा केली आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने मार्च महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. या काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेल्याने आर्थिक कोंडी झाली. अशातच मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत घरगुती वापराच्या विजेचे दुप्पट-तिप्पट देयक आकारण्यात आले. हे वीज देयक माफ करण्याच्या मागणीकरिता अनेकदा निवेदन दिले पण, काहीही फरक पडला नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात मनसेने जनआक्रोश मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
१ एप्रिलपासून वीज दरवाढीचा महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने वीज ग्राहकांना चांगलाच शॉक दिला. लॉकडाऊनच्या काळात बेरोजगारी वाढल्याने जनता होरपळून निघाली. सामान्यांच्या हाताला काम नसल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. अशातच भरमसाठ देयक दिल्याने कुटुंबाला जगवावं की वीज देयक भरावं, असा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. आधी शंभर युनिटपर्यंत वीज देयकामध्ये सवलत देण्याचे आश्वासन देणाऱ्या ऊर्जा मंत्र्यांनी आता घुमजाव करुन वीज देयक भरलेच पाहीजे, अशी भाषा केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची झालेली ही अडचण सोडविण्याकरिता तातडीने उपाययोजना करण्यासंदर्भात मुख्यमंत्री, ऊजामंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, मुख्य कार्यकारी अभियंता यांना बरेचदा निवेदन दिले.
आंदोलने केली तसेच काळे कपडे परिधान करून निषेध केला तरीही जाग आली नाही. त्यामुळे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता हे जनआक्रोश आंदोलन करण्यात आले आहे. आता जोपर्यंत लॉकडाऊन काळातील वाढीव वीज देयक सरसकट माफ करणार नाही तो पर्यंत वीज जोडणी कापू देणार नाही. महाविरतणच्या कर्मचाऱ्यांकडून विद्युत जोडणी कापण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना ताकतीने उभी राहून कायदा हातात घेणार, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री व ऊर्जा मंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे. शहरातील पोस्ट ऑफीस चैाकातून निघालेला हा मोर्चा डॅा. बाबासाहेब आंबेडकर चैाकात थाबविण्यात आला. येथून शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवेदन दिले.
या मोर्चात नितीन अमृतकर, जिल्हा उपाध्यक्ष अमोल बोरकर, विजू वाघमारे, सुभाष चौधरी, शंकर पोटफोडे, राहुल वाढोणकर, जिल्हासचिव सुनील भुते, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष रमेश घंगारे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष किशोर चांभारे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष शुभम दांडेकर, राहुल सोरटे, मारोती महाकाळकर, उमेश नेवारे, शेतकरी सेना जिल्हा उपाध्यक्ष मनोज गिरडे, सुधाकर वाढई, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजु मुडे, तालुकाध्यक्ष निलेश खाटीक, जयंता कातरकर, वासुदेव वैरागडे, अमोल मेंढुले, मोरेश्वर येडें, राजु भोंमले, किशोर हुलके, धनंजय भोंभे यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.