तोकडे मनुष्यबळ सांभाळतेय आरोग्याचा डोलारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 05:00 AM2020-07-31T05:00:00+5:302020-07-31T05:00:09+5:30
जिल्ह्यामधील १५ लाख ७८ हजार ६२० लोकांना मोफत आरोग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर आहे. जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण आरोग्य यंत्रणेमध्ये १ हजार ३७८ जागा मंजूर आहेत. त्यापैकी ९४६ जागा भरल्या असून तब्बल ३१.३४ टक्के जागा रिक्त आहेत. अशाही परिस्थितीत आरोग्य यंत्रणा सेवा देत आहे.
आनंद इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनायनात काही चांगल्या तर काही वाईट गोष्टींचाही अनुभव आला आहे. आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या आरोग्य विभागाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. निधीची कमतरता आणि रिक्त पदांचे ग्रहण असतानाही जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा तोकड्या मनुष्यबळाच्या जोरावर यशस्वीपणे आरोग्याचा डोलारा सांभाळत आहे.
जिल्ह्यामधील १५ लाख ७८ हजार ६२० लोकांना मोफत आरोग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर आहे. जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण आरोग्य यंत्रणेमध्ये १ हजार ३७८ जागा मंजूर आहेत. त्यापैकी ९४६ जागा भरल्या असून तब्बल ३१.३४ टक्के जागा रिक्त आहेत. अशाही परिस्थितीत आरोग्य यंत्रणा सेवा देत आहे. शासकीय आरोग्य यंत्रणेला सेवाग्राम व सावंगी येथील रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचेही सहकार्य मिळत आहे. यामुळेच या कोरोनाच्या आपत्तीकाळात आरोग्य यंत्रणेसमोर मोठ्या अडचणी असतानाही जिल्हा प्रशासनाची समर्थपणे लाभलेल्या सहकार्यामुळे वर्धा जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनच्या दीड महिन्यापर्यंत कोरोनाला थारा मिळाला नाही. त्यानंतरही कोरोनाची रुग्ण संख्या वाढायला लागल्यामुळे आरोग्य विभागाकडून अंगणवाडी सेविका, आरोग्यसेविका व नोडल अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले.यातूनच कोरोनासह डेंग्यू व इतर आजारावरही नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. सध्या कोरोनामुळे सर्वत्रच बाह्यरुग्णांची संख्या कमी झाली आहे.
प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या या कोविड योद्धांची गेल्या तीन महिन्यांपासून मोठी कसरत सुरू आहे. घरावरती तुळशीपत्र ठेवून कर्तव्य बजावत आहे. त्यामुळे या कोरोना आपत्तीपासून धडा घेत शासनाने आरोग्य यंत्रणेला सोयी, सुविधा व मनुष्यबळाने भक्कम करण्याची गरज व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील आरोग्यासाठी दरवर्षी मिळणारा निधी
जिल्हा परिषद
जि.प.आरोग्य विभागाला जिल्हा नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, राष्ट्रीय आरोग्य अभियान व जि.प.सेस फंडातून निधी मिळतो. दरवर्षी जवळपास १५ कोटीचा निधी उपलब्ध होतो.
आरोग्य विभाग
शासनासह जिल्हा नियोजन समितीतून निधी मिळतो. तसेच औषधी पुरवठा शासनाकडूनच होत असल्याने वार्षिक निधीची माहिती उपलब्ध नाही.
जिल्हा रुग्णालयात
आतापर्यंत ८,३८० व्यक्तींचे स्वॅब तपासणीकरिता पाठविले. त्यापैकी ८,१६२ अहवाल प्राप्त झाले असून ७,९३४ अहवाल निगेटिव्ह आलेत.बाहेर जिल्ह्यातून आलेल्या ६८,१५० व्यक्तींना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यापैकी ५,९८१ गृह विलगीकरणात आहेत.