शिक्षकांना बीएलओच्या कामातून मुक्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 06:00 AM2020-01-22T06:00:00+5:302020-01-22T06:00:11+5:30
बी.एल.ओ. च्या कामाकरिता शाळेच्या कामकाजातून तात्पुरती सूट मिळत असली तरी शिक्षकांचे अभ्यासक्रम बी.एल.ओ. च्या कामामुळे पूर्ण होत नाही. त्यासाठी दुसरी पर्यायी व्यवस्था शालेयस्तरावर केली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरित परिणाम होत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शिक्षकांना बी.एल.ओ. च्या कामातून मुक्त करा, अशी मागणी उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांना निवेदनातून करण्यात आली. शिक्षकांची बी.एल.ओ. म्हणून केलेली नियुक्ती आणि त्यातून वर्षभर चालणारे मतदार याद्याबाबतचे काम यामुळे शिक्षकांच्या मूळ अध्यापन व इतर कामांवर परिणाम होत आहे. याचे वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययन कौशल्यावर होत आहे. तसेच अध्यापनाचे काम सुध्दा व्यवस्थित होत नसल्याने शिक्षकांना पालकांच्या रोषाला समोर जावे लागत आहे.
बी.एल.ओ. च्या कामाकरिता शाळेच्या कामकाजातून तात्पुरती सूट मिळत असली तरी शिक्षकांचे अभ्यासक्रम बी.एल.ओ. च्या कामामुळे पूर्ण होत नाही. त्यासाठी दुसरी पर्यायी व्यवस्था शालेयस्तरावर केली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरित परिणाम होत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
निवडणूक विभागाच्या आदेशानुसार शिक्षकांना कायम बी.एल.ओ. कामाकरिता नियुक्त करण्याचे आदेश नाहीत. तसेच शिक्षण हक्क कायद्यामधील कलम २७ नुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्याबाबत प्रतिबंध घालण्यात आले आहे. त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाने सुद्धा बी.एल.ओ.चे काम ऐच्छिक असल्याबाबतचे आदेश वेळोवेळी दिलेले आहे. या सर्व बाबींकडे गांभीर्याने लक्ष घालून शिक्षकांना बी.एल.ओ. च्या कामातून मुक्त करून पर्यायी व्यवस्था करावी, याबाबत चर्चा करून उपविभागीय अधिकारी बगळे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तक्रार निवारण समितीचे पुंडलिक नागतोडे, अजय भोयर, कुंडलिक राठोड, संतोष महाजन, रवी चौधरी, मुकेश इंगोले, किशोर उमाटे, मारोती सयाम, एन.एन. गोखले, अविनाश धात्रक, रहीम शहा, परमेश्वर केंद्रे, संदीप चांभारे, किशोर ढेंगरे, नितीन वाघ, प्रशांत सयाम, नीलेश भालकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.