देऊरवाडा/आर्वी : कोविड-१९ या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन अद्याप सुरूच आहे. पावसाळ्याला केवळ पंधरा दिवसांचा अवधी उरला आहे. त्यामुळे या लॉकडाऊन काळात अडचणीत सापडलेल्या बळीराजाला आता पेरणीचे ओढ लागली आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकरी राजाने शेतातील कामाला प्राधान्य देत पहाटे पाच वाजल्यापासूनच मशागतीच्या कामाला सुरुवात केल्याचे चित्र आहे.जवळपास अडीच महिन्यांत पासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. ७ जूनला पावसाची सुरुवात होणार, या आशेने पहाटे पाच वाजताच शेतकरी शेतीकामांना सुरुवात करीत शेतातील काडीकचरा वेचण्याचे काम सुरू आहे. या लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले. कापूस तूर, चणा घरी पडून आहे. शेतमालाला भाव नाही. सीसीआयची खरेदी नाही. नाफेडची खरेदी संथगतीने सुरू आहे. परिणामी, मातीमोल भावात शेतमाल विकण्याशिवाय पर्याय नाही.निसर्गाचा लहरीपणा, वादळी पावसाने केलेले नुकसान अशा शेकडो बाबींनी बेजार असूनही शेतकरी मान्सूनपूर्व शेतीकामात व्यस्त आहे. पहाटे पाच ते सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत शेतात कामे करून घराकडे परततो आहे.बैलजोड्यांची अडचण भासत असल्याने शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने व्ही-पास, वखर, मोगरा आदींचा या मशागतीत समावेश आहे.घरच्याच बियाण्यांचा करतात वापरलॉकडाऊनमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. बी-बियाणे पेरणीसाठी पैसा आणायचा कोठून, या चिंतेत शेतकरी असून घरच्याच बियाण्यांना शेतकरी प्राधान्य देत आहे. इकडे कृषी दुकानदाराने बियाणे, खते मे महिन्यात आणली आहे. जून महिन्यातच शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी धावपळ होते. बहुतांश कृषी केंद्रचालकांनी नवीन बी-बियाणे आणले आहे.