आर्वीतील उपाययोजनांची केली जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 05:00 AM2020-03-31T05:00:00+5:302020-03-31T05:00:11+5:30
आर्वी येथील रोज भरणारा बाजार हा इंदिरा चौकात भरत होता, तो बाजार इंदिरा चौकातून आर्वी शहरातील पाच वेगवेगळ्या ठिकाणी भरविण्यात येत आहे. यातील ४ ठिकाणी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट दिली. नगर परिषद,महसूल विभाग व पोलिस विभाग तसेच सामाजिक संघटनेचा सहभाग घेऊन केलेल्या कार्यवाहीबाबत व कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी/वर्धा : कोरोनाच्या संदर्भात आर्वी शहरात करण्यात येत असलेल्या उपाय योजनांची रविवारी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी पाहणी केली. तसेच पुढील नियोजन व कार्यवाही बाबत कामांचा आढावा घेतला यावेळी त्यांच्यासमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे भेट देऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यास त्यासंदर्भात तयार करण्यात आलेले विलगीकरण कक्षाची पाहणी केली. पुणे, मुंबई आणि इतर शहरातून आर्वी येथे आलेल्यांची कशा प्रकारे तपासणी करण्यात येत आहे याबाबत पाहणी करून संबंधित कामाचा आढावा सुद्धा घेतला.
आर्वी येथील रोज भरणारा बाजार हा इंदिरा चौकात भरत होता, तो बाजार इंदिरा चौकातून आर्वी शहरातील पाच वेगवेगळ्या ठिकाणी भरविण्यात येत आहे. यातील ४ ठिकाणी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट दिली. नगर परिषद,महसूल विभाग व पोलिस विभाग तसेच सामाजिक संघटनेचा सहभाग घेऊन केलेल्या कार्यवाहीबाबत व कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
कुठेही गर्दी होणार नाही याबाबत पुरेशी दक्षता घेण्यासही त्यांनी सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि भाजीपाला दलाल बाजाराची पाहणी करून गर्दीचे नियोजन करण्या संदर्भात सुचना दिल्यात. आर्वी येथील विश्रामगृहात महत्वाचे विभाग प्रमुखांची कोरोना विषाणू संसर्ग संदर्भात बैठक घेतली. यावेळी नगरप्रशासन, महसूल व पोलीस विभाग यांचा आढावा घेतला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासंदर्भात कोणत्या उपाय योजना करावयाची आहे याची माहिती दिली. तसेच निवासाची, भोजनाची व्यवस्था नसलेल्यांची मजूर वर्गासाठी सोयी सुविधा करण्याचे निर्देश दिलेत. तसेच ग्रामीण भागातील आठवडी बाजारात सुद्धा आर्वीप्रमाणे बाजाराचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी गट विकास अधिकारी यांना दिलेत. आर्वी नगरपंचायतीचे सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प संदर्भात निवडलेल्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. आणखी जागेच्या अनुषंगाने नियोजन करून अहवाल सादर करण्यास मुख्याधिकारी नगर परिषद यांना सांगितले. यासोबतच जिल्हाधिकारी यांनी वर्धेतील बच्छराज धर्मशाळा आणि मदनमोहन या दोन शेल्टर होमला भेट देवून तेथील व्यवस्थेची पाहणी केली. जिल्हयात ७ ठिकाणी शेल्टर होम तयार केले असून तिथे सुमारे ३०० कामगार, मजुरांची व्यवस्था करण्यात आली. त्यांची आरोग्य तपासणी, पाणी, जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून या कामी सामाजिक संस्थांची मदत घेण्यात येत आहे.