रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 14:55 IST2026-04-21T14:54:55+5:302026-04-21T14:55:45+5:30
कसारा जवळील कळभोंडे लाद्याची वाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू
कसारा जवळील कळभोंडे लाद्याची वाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लाद्याची वाडी येथील कृष्णा भागा आगीवले असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव असून मंगळवारी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या दरम्यान कळभोडा येथील कृष्णा आगीवले हा जंगलातील रानमेवा गोळा करण्यासाठी गेला होता. झाडावरील आंबे वा करवंदं गोळा करत असताना जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक कृष्णावर झडप घातली.
झटापटीत फरपटत नेलेल्या कृष्णाचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी या प्रकरणामुळे वनमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांना वनअधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याचं म्हटलं जात आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. अशा परिस्थितीत डोळखांब, वाशाळा वन विभागाच्या स्थानिक पातळीवरील यंत्रणा म्हणून कार्यरत असलेले वन परीक्षेत्र अधिकारी, वनपाल व वन रक्षक यांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागरिकांचे संरक्षण, सतर्क गस्त व योग्य उपाययोजना करण्यात झालेल्या कथित दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा स्थानिकांमध्ये होत आहे.
या बाबत सविस्तर वृत्ती असं की, कृष्णा आगीवले हा मुलगा सकाळच्या सुमारास घराजवळील रानात रानमेवा गोळा करीत असताना दडून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती स्थानिक गावकऱ्यांना मिळताच गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी गर्दी केली. या घटनेनंतर वन विभागाच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
परिसरात बिबट्याचा वावर अनेक दिवसांपासून दिसत असल्याची माहिती स्थानिकांनी वन विभागाला दिली होती. मात्र कोणतीही ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्याने अखेर एका निष्पाप बालकाचा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी तात्काळ बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावावेत, परिसरात गस्त वाढवावी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे आगीवले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
आई पोटासाठी कामाला...
दरम्यान या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कृष्णाला वडील नाहीत. त्यामुळे घरची जबाबदारी कृष्णाच्या आईवर आहे. आपल्या कुटुंबाचा उधारनिर्वाह व्हावा यासाठी कृष्णाची आई गुलाबीबाई ही आळेफाटा येथे कांदे काढायच्या कामासाठी रोजंदारीवर कामाला गेल्या. ३ मुलांना घरालगत मामाकडे ठेवून कामाला गेलेल्या माऊलीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान सकाळी आठ वाजता घडलेल्या घटनेची माहिती स्थानिक वनविभाग यांना देऊन देखील १२ वाजेपर्यंत वनकर्मचारी घटनास्थळी दखल न झाल्याने मृतदेह उन्हात पडून होता.