ठाण्यात वीजेच्या धक्क्याने सहा वर्षीय मुलाचा मृत्यू; नगरसेवकांसह स्थानिकांचे ठिय्या आंदोलन
By जितेंद्र कालेकर | Updated: May 5, 2026 00:25 IST2026-05-05T00:24:10+5:302026-05-05T00:25:32+5:30
महावितरणच्या अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

ठाण्यात वीजेच्या धक्क्याने सहा वर्षीय मुलाचा मृत्यू; नगरसेवकांसह स्थानिकांचे ठिय्या आंदोलन
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: वीजेच्या धक्क्याने समर शेख या सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत आहे. घटनेस जबाबदार असलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिकांनी केली. याच मागणीसाठी स्थानिक रहिवाशांसह भाजपचे नगरसेवक अमित सरैय्या यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यातच रात्री १०.३० ते ११.३० वाजण्याच्या सुमारास ठिय्या आंदोलन केले.
वागळे इस्टेट, इंदिरानगर भागात हा समर हा लोखंडी जिन्याजवळील अँगलवर वाळत टाकलेली गोधडी काढण्यासाठी गेला. त्यावेळी वीजेच्या धक्क्याने तो बेशुद्ध पडला. घाबरलेल्या पालकांनी त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या घटनेने संताप व्यक्त होत असून महावितरणच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करीत स्थानिक रहिवाशांनी रात्री श्रीनगर पोलीस ठाण्यात एकत्रित येत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. याप्रकरणी चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलजारीलाल फडतरे यांनी दिले.