भावाने सख्ख्या बहिणीचं कुंकू पुसलं; पुण्याहून हॉटेलमध्ये जेवायला बोलावलं अन् संसारच उद्ध्वस्त केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 12:28 IST2026-01-30T12:12:27+5:302026-01-30T12:28:10+5:30
सोलापुरात भावानेच बहिणीच्या पतीची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

भावाने सख्ख्या बहिणीचं कुंकू पुसलं; पुण्याहून हॉटेलमध्ये जेवायला बोलावलं अन् संसारच उद्ध्वस्त केला
Solapur Crime: कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेमसंबंधातून झालेल्या विवाहाचा राग धरुन मेव्हण्याने तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी मेहुण्याने हॉटेलमध्येच मद्य प्राशन करताना वाद विकोपाला गेला अन् नशेतच बहिणीच्या समोर दारुची बाटली फोडली अन् भावोजीचा गळा चिरला. रात्रीच्या वेळी रक्ताने जेवणाच्या टेबलासह परिसर रक्ताच्या चिळकांड्याने लालबुंद झाला. भावोजीने दवाखान्यात अखेरचा श्वास घेतला. रागाच्या भरात केलेल्या या कृत्यानं सख्ख्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलं.
याबाबत वैजिनाथ बंकट क्षीरसागर यांनी पांगरी पोलिसात फिर्याद दिली. सुशील व रेश्मा यांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र, या विवाहाला रेश्माच्या कुटुंबीयांचा विरोध होता. सुशील व त्याची पत्नी रेश्मा हे दोघे कामानिमित्त पुणे येथे वास्तव्यास होते. सुशीलच्या मावशीच्या कार्यक्रमानिमित्त दोघे येडेश्वरी येथे आले होते. त्यानंतर ते उक्कडगाव येथे सासू व सासऱ्याकडे गेले होते.
आरोपी ऋषिकेशने आपण हॉटेलवर जेवायला जाऊ, असे सांगून बुधवारी रात्री सातच्या सुमारास भावोजी सुशील, पत्नी रेश्मा, भाऊ ऋषिकेश, त्याची मैत्रीण काजल सुरज मिसाळ आणि मामा मच्छिंद्र भीमा चव्हाण हे सर्वजण पांगरी येथील हॉटेल शिवनेरीत जेवणासाठी गेले होते. जेवणाच्या वेळी रेश्मा हिच्या विवाहाच्या कारणावरून आपल्या दोघांचीही आडनावे एकच असून, हे लग्न कसे केले, असे आरोपीन म्हटले. त्यावर बहीण रेश्माने 'आमचे प्रेमसंबंधातून लग्न झालेले आहे, तू त्यांना काही बोलू नकोस' असे म्हटले. यावरून सुशील व ऋषिकेश यांच्यात वाद झाला आणि यातून ही घटना घडली.
वाद विकोपाला गेला अन् खून झाला..
दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि ऋषिकेशने हातातील दारूची बाटली फोडून सुशीलच्या गळ्यावर वार केला. या हल्ल्यात सुशील गंभीर जखमी झाला व त्याच्या गळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. हॉटेल मालक अण्णा घावटे यांनी जखमी सुशीलला खासगी वाहनाने ग्रामीण रुग्णालात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी त्याला जगदाळेमामा हॉस्पिटल, बार्शी येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
हॉटेलमध्ये रक्ताचा सडा
बाटली फोडून गळ्यावर वार केल्याने हॉटेलमधील खोलीत रक्ताचा सडा पडल्याचे चित्र दिसून आले. हॉटेलमालकाने तातडीने पांगरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जेवणाच्या टेबलावर सर्वत्र रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या होत्या. या प्रसंगामुळे सर्वांचाच थरकाप उडाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
नियतीला सुख पाहावलं नाही
या घटनेतील मयत सुशील क्षीरसागर याचे दहावीपर्यंतचे शिक्षण बार्शी येथे झाले होते. लग्न झाल्यानंतर तो कामानिमित्त पुण्याला गेला. तेथे ड्रायव्हिंग काम करत होता. पत्नी रेशमा ही नर्स म्हणून खाजगी दवाखान्यात काम करत होती. दोघांचा गुण्यागोविंदानं संसार सुरु होता. मात्र नियतीला जणू हे सुख पाहावलं नाही.