राऊत यांचे हे दुसरे स्मरणपत्र आहे. त्यांनी केंद्रीय मंत्र्यांसोबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे ई-मेलद्वारे पत्रव्यवहार करून मिल सुरू करण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारने अनलॉक तर राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन म्हणत राज्यातील उद्योग सुरू केले आहेत. ग्रामीण भागातील उद्योग पहिल्याच टप्प्यात सुरू करण्यात आले. मात्र, बार्शीतील ४०० कामगारांच्या कुटुंबाचा गाडा चालविणारी मिल अद्यापही बंदच आहे. त्यामुळे, कामगारांच्या रोजी-रोटीचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
बार्शी मिलमध्ये सद्यस्थितीत जवळपास १७५ कायम, ६० बदली व १४० कंत्राटी कामगार काम करतात. मात्र, गेल्या ५ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून ही मिल बंद असल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र सरकारचा प्रकल्प असल्याने कायम व बदलीतील कामगारांना ५० टक्केच वेतन दिले जात आहे. मात्र, कंत्राटी कामगारांना जून महिन्यांपासून वेतन बंद केले आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात आ. राऊत यानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही मागणी केली होती.
मिलमध्ये १०० पेक्षा जास्त महिला कामगार आहेत, त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे, लवकरात लवकर मिल सुरू करण्याची मागणी कामगारांकडून होत आहे.