१७ लाखांचे पॅकेज, पण सुख नाही! लोकांना फसवलं जातंय म्हणत तरुणाने सोडली बँकेमधील नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 12:09 IST2026-04-16T11:47:49+5:302026-04-16T12:09:27+5:30
आयआयटी दिल्लीतील तरुणाने बँकिंग क्षेत्राला कंटाळून मोठ्या पगाराची नोकरी सोडली आहे.

१७ लाखांचे पॅकेज, पण सुख नाही! लोकांना फसवलं जातंय म्हणत तरुणाने सोडली बँकेमधील नोकरी
Toxic Work Culture: आजच्या स्पर्धेच्या युगात आयआयटीमधून पदवी मिळवणे आणि वार्षिक १७ लाख रुपयांच्या पगाराची नोकरी मिळवणे, हे अनेकांसाठी स्वप्न असते. मात्र, आयआयटी दिल्लीच्या एका २४ वर्षीय तरुणाने या अशा नोकरीला लाथ मारत कॉर्पोरेट क्षेत्रातील टॉक्सिक वर्क कल्चर पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली आहे. चिराग मदान या तरुणाने आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर एकच चर्चा सुरू झाली आहे.
९ ते ५ ची नोकरी अन् १० मिनिटांचा लंच!
चिराग मदान कॉर्पोरेट बँकिंग क्षेत्रात कार्यरत होता. त्याने सांगितले की, सुरुवातीला सकाळी ९ ते ५ अशी वाटणारी ही नोकरी हळूहळू ९ ते ७ आणि आठवड्यातून ५ ऐवजी ६ दिवस अशी विस्तारत गेली. कामाचा ताण इतका होता की, जेवणासाठी मिळणारा १ तासाचा वेळ फक्त १० ते १५ मिनिटांवर आला होता. कामाच्या ओझ्याखाली दबलेल्या कर्मचाऱ्यांकडून रॉकेट स्पीडने जेवण संपवण्याची अपेक्षा केली जात होती.
१० कोटींचे टार्गेट आणि सेलिंगचा सापळा
बँकिंग क्षेत्रातील कडू वास्तव मांडताना चिरागने सांगितले की, कर्मचाऱ्यांवर १० कोटी रुपयांपर्यंतचे टार्गेट पूर्ण करण्याचे प्रचंड दडपण असायचे. हे टार्गेट पूर्ण झाले नाही तर मानसिक छळाची टांगती तलवार डोक्यावर असल्याने कर्मचारी मेटाकुटीला यायचे.
चिरागने यावेळी एका धक्कादायक प्रकाराचाही उल्लेख केला. बँकिंग क्षेत्रात मिस सेलिंग (ग्राहकांना चुकीची माहिती देऊन गुंतवणूक करायला लावणे) हा प्रकार सर्रास चालतो. त्याने एका ग्राहकाचे उदाहरण दिले, ज्याच्या पोर्टफोलिओमध्ये आधीच्या बँक मॅनेजरने चुकीच्या पद्धतीने गुंतवणूक केली होती. केवळ आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठी ग्राहकांच्या कष्टाच्या पैशाशी खेळ खेळला जातो, हे पाहून चिरागने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
आजारी पडलात तरीही जाब द्यावा लागणार!
कॉर्पोरेट जगतात कर्मचाऱ्यांच्या आरोग्यापेक्षा कामाला महत्त्व दिले जाते, हे चिरागच्या अनुभवातून स्पष्ट होते. त्याने सांगितले की, जर एखाद्या कर्मचाऱ्याला आजारपणामुळे सुट्टी हवी असेल, तर त्यासाठीही सविस्तर स्पष्टीकरण द्यावे लागे. सुट्टी मिळवणे हे एखाद्या युद्धापेक्षा कमी नव्हते.
सोशल मीडियावर उमटले तीव्र पडसाद
चिरागचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बँकिंग आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील इतर कर्मचाऱ्यांनीही आपल्या व्यथा मांडल्या आहेत. एका युजरने म्हटले की, "मी सुद्धा २३ व्या वर्षी अॅक्सिस बँकेची नोकरी याच कारणास्तव सोडली. बँकिंगमध्ये मार्च महिना तर सर्वात भयानक असतो."