कोल्हापूरहून येणाऱ्या गाड्या अडविणार

By Admin | Updated: January 9, 2015 00:16 IST2015-01-08T23:42:52+5:302015-01-09T00:16:18+5:30

नीतेश राणे यांचा इशारा : निर्णय न बदलल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश बंदी

Trains coming from Kolhapur will be stopped | कोल्हापूरहून येणाऱ्या गाड्या अडविणार

कोल्हापूरहून येणाऱ्या गाड्या अडविणार

कणकवली : कोल्हापूर येथून कोकणात येणाऱ्या एस.टी.च्या गाड्या रंकाळा स्थानकाऐवजी संभाजीनगर स्थानकावरून सोडण्याच्या निर्णयाबद्धल १५ जानेवारीपर्यंत तोडगा न निघाल्यास कोल्हापूर येथून सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या गाड्या दाजीपूर येथे अडविण्याचा इशारा आमदार नीतेश राणे यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत आज, गुरुवारी दिला आहे.
याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास कोल्हापुरातील गाड्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही, असाही इशारा राणे यांनी यावेळी दिला.यावेळी आमदार राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोल्हापूर येथे जाणाऱ्या एस.टी.च्या गाड्या १ जानेवारीपासून संभाजीनगर स्थानकापर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सिंधुदुर्गमधील प्रवाशांचे हाल होत आहेत. तसेच एस.टी.च्या भारमानातही घट झाली आहे. याप्रश्नी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल, असेही राणे यांनी स्पष्ट केले.
३२ फेऱ्यांसाठी आटापिटा
सिंधुदुर्ग एस.टी. विभागातून दररोज एस.टी.च्या ३२ फेऱ्या कोल्हापूर येथे होत असतात. मात्र, या गाड्यांमुळे कोल्हापुरात वाहतुकीची कोंडी होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. कोल्हापूर जिल्ह्याबाहेरून कोल्हापूर शहरात असंख्य वाहने दररोज दाखल होत असतात. त्या तुलनेत सिंधुदुर्गमधून एस.टी.च्या कोल्हापुरात जाणाऱ्या गाड्यांची संख्या नगण्य आहे.
त्यामुळे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाविरोधात त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोल्हापूर येथे जाणाऱ्या एस.टी.च्या गाड्या संभाजीनगर स्थानकापर्यंत नेण्याच्या निर्णयामुळे सिंधुदुर्ग एस.टी. विभागाच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे. याबाबतचा अहवाल मुंबई येथील एस.टी. प्रादेशिक कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. तसेच या निर्णयाला विरोध दर्शविण्यात आला आहे. मात्र, याबाबतचा निर्णय वरिष्ठ स्तरावरूनच घेण्यात येईल, अशी माहिती एस.टी.चे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांनी दिली.


१५ ते ८० रुपये भुर्दंड
पणजी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, राधानगरी, देवगड, गगनबावडा डेपोंच्या गाड्या, विजयदुर्ग या प्रमुख गाड्यांतील प्रवाशांना शहरात येण्यासाठी संभाजीनगर येथे उतरावे लागणार आहे. येथे शहरात येण्यासाठी रिक्षा किंवा के.एम.टी.बसचा आधार घ्यावा लागणार आहे. यामुळे कमीतकमी १५ ते ८० रुपयांपर्यंत आता जादा पैसे मोजावे लागत आहे. तसेच गगनबावडामार्गे मध्यवर्ती बसस्थानकावरून पुढे मार्गस्थ होणाऱ्या गाड्यांचे किलोमीटर वाढल्याने त्यांच्या तिकिटाच्या दरामध्ये नऊ रुपयांची वाढ झाली आहे.

कोंडी कमी करण्यासाठी
कोल्हापूर शहरातून कोकणात जाणाऱ्या व येणाऱ्या एस.टी. गाड्यांमुळे वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी यामध्ये बदल करण्यात आला आहे. कोकणातून येणाऱ्या काही एस.टी. बसेस मध्यवर्ती बसस्थानकापर्यंत न येता संभाजीनगर बसस्थानकापर्यंत येतील व तेथूनच पुन्हा कोकणात जाणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी १ जानेवारी २०१५ पासून लागू झाली आहे.

Web Title: Trains coming from Kolhapur will be stopped