मालक भात कापणीसाठी गेल्याची संधी साधत चोरट्यांकडून घरफोडी, २२ लाखांचा मुद्देमाल लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 16:58 IST2025-11-05T16:57:02+5:302025-11-05T16:58:21+5:30
माकड असल्याचे समजून दुर्लक्ष केले, दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण

मालक भात कापणीसाठी गेल्याची संधी साधत चोरट्यांकडून घरफोडी, २२ लाखांचा मुद्देमाल लंपास
कणकवली : घर मालकासह कुटुंबीय भात कापणीसाठी शेतात गेली असल्याची संधी साधत कळसुली, गडगेवाडी येथे दिवसाढवळ्या चोरट्यांनी घरफोडी केली आहे. या धाडसी घरफोडीत चोरांनी २० तोळे सोने, ११ तोळे चांदी आणि सुमारे सव्वा दोन लाख रुपये रोख रक्कम असा सुमारे साडेबावीस लाखाचा ऐवज घेऊन पोबारा केला आहे. मंगळवारी दुपारी १२.३० ते १ वाजण्याच्या सुमारास ही चोरीची घटना घडली आहे.
कळसुली, गडगेवाडी येथील विनायक भिकाजी दळवी यांच्या घरी ही चोरी झाली. सध्या भात कापणीचा हंगाम सुरू असल्याने मंगळवारी दुपारी कळसुली, गडगेवाडी येथील विनायक दळवी व कुटुंबीय भात कापणीसाठी शेतात गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी घराला लक्ष्य केले.
दळवी कुटुंब दुपारी शेतातून घरी परतल्यानंतर त्यांना घराच्या पाठीमागील दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरात प्रवेश केला असता, घरातील कपाटांमधील सर्व साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत फेकलेले दिसले. कपाटांची तपासणी केली असता, त्यामधील अंदाजे २० तोळे सोने, ११ तोळे चांदीचे दागिने आणि सुमारे २ लाख १५ हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आले.
दरम्यान, दुपारच्या सुमारास विनायक दळवी यांचे घर बंद असल्याने घरावर माकड आले असल्याचे समजते. त्याचा आवाजही त्यांना आला होता. मात्र, माकडांचा वावर कळसुली गावात मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने या प्रकाराकडे दळवी कुटुंबीयांनी दुर्लक्ष केले होते. पण घरी आल्यानंतर घराचा दरवाजा त्याचप्रमाणे घरातील साहित्य, कपाट व अन्य वस्तू विस्कटलेल्या दिसल्याने चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या घटनेची माहिती मिळताच कळसुलीचे सरपंच सचिन पारधिये आणि पोलिस पाटील सारिका कदम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कणकवली पोलिस तत्काळ दळवी यांच्या घरी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला. पोलिस उपनिरीक्षक महेश शेडगे, कनेडी दुरक्षेत्राचे पोलिस हवालदार सुनील वेंगुर्लेकर यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची नोंद कणकवली पोलिस ठाण्यात करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.त्यामुळे अधिक माहिती समजू शकली नाही.
दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या चोरीमध्ये चोरट्याने कशाप्रकारे डाव साधला याबाबत तर्कवितर्क लढविले जात असून चोरी झालेली घरे रस्त्याच्या बाजूला असल्याने चोरट्याने चोरीला येताना दुचाकीचा आसरा घेतला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घराजवळ जाण्यासाठी तीन रस्ते असल्याने नेमके चोरटे कोणत्या दिशेने गेले याबाबतही पोलिस शोध घेत आहेत.