Corona in sindhudurg : यापुढे ग्रामीण भागातही दुचाकी बंदी : के. मंजुलक्ष्मी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 02:37 PM2020-04-02T14:37:47+5:302020-04-02T14:40:38+5:30
ओरोस : कोरोना प्रसाराच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना म्हणून जिल्ह्याच्या नागरी भागात १ एप्रिलपासून दुचाकी बंदी घातली आहे. आता ही बंदी ...
ओरोस : कोरोना प्रसाराच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना म्हणून जिल्ह्याच्या नागरी भागात १ एप्रिलपासून दुचाकी बंदी घातली आहे.
आता ही बंदी ग्रामीण भागातही घालणार आहोत. यापूर्वी जिल्ह्याच्या शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातसुद्धा जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा देण्याचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
यावेळी मंजुलक्ष्मी म्हणाल्या, दुचाकी बंदीचा पहिला दिवस होता. त्यामुळे काही त्रुटी राहिल्या असतील. पण या त्रुटी दूर करून गुरुवारपासून दुचाकी बंदी अजून कडक करण्यात येणार आहे. नागरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातसुद्धा दुचाकी बंदी करण्यात येणार आहे.
यासाठी नगरपंचायतीप्रमाणे ग्रामपंचायतींना आपल्या कार्यक्षेत्रातील लोकांना जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर जिल्हा परिषद स्तरावर त्याचे नियोजन करीत आहेत. हे नियोजन पूर्ण झाल्यावर ग्रामीण भागातसुद्धा दुचाकी बंदी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते यांनी, जिल्ह्यातील ८७ टक्के रास्त धान्य दुकानांवर एप्रिल महिन्याचे धान्य पोहोचले आहे.
या आठवड्याच्या अखेरपर्यंत सर्व धान्य पोहोचणार आहे. तसेच जिल्हा गोदामामध्ये सध्या ७५२ मेट्रिक टन गहू उपलब्ध आहे. तर १४८२ मेट्रिक टन तांदुळ उपलब्ध आहेत. मात्र, महाराष्ट्र शासनाने पुढील तीन महिन्यांसाठी जाहीर केलेल्या ५ किलो तांदुळ योजनेतील तांदूळ अद्याप उपलब्ध झालेला नाही.
हे धान्य एप्रिल अखेरपर्यंत उपलब्ध होईल. मे महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांनंतर हे धान्य रास्त धान्य दुकानांवर उपलब्ध होणार आहे. यासाठी जिल्ह्याला १० हजार ३५ मेट्रिक टन तांदुळ लागणार आहेत, अशी माहिती दिली.
पत्रकारांना ई-पासची गरज नाही
जिल्ह्यात सध्या संचारबंदी आहे. कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना म्हणून नागरी क्षेत्रात दुचाकी बंदी करण्यात आलेली आहे. यात अत्यावश्यक सेवेसाठी सवलत देण्यात आलेली आहे. मात्र, यासाठी पोलिसांनी तयार केलेल्य अॅपवर जाऊन ई-पास घ्यावा लागणार आहे.
हे पास असलेल्या व्यक्तींनाच परवानगी मिळणार आहे. मात्र, यातून जिल्ह्यातील पत्रकारांना सूट देण्यात आली असून ते बातम्यांकरिताच फिरत असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.