कऱ्हाड-विटा रस्त्यावर पहिल्याच पावसात पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 02:41 PM2021-06-17T14:41:33+5:302021-06-17T14:43:20+5:30
Rain Satara : सैदापूर हद्दीत असणारा कराड-विटा रस्ता हा मागील काही वर्षांत पावसाळ्यात खूप अडचणीचा ठरत आहे. पावसाळ्यात याठिकाणी पाणी भरते आणि रहिवाशांना आणि दुकानदारांना मोठ्या गैरसोईचा सामना करावा लागतो. पूर्वी पावसाळ्याच्या शेवटी येथे पाणी साठत होते. नंतर मोठा आणि सलग पाऊस आला की पाणी साठू लागले.
ओगलेवाडी : सैदापूर हद्दीत असणारा कराड-विटा रस्ता हा मागील काही वर्षांत पावसाळ्यात खूप अडचणीचा ठरत आहे. पावसाळ्यात याठिकाणी पाणी भरते आणि रहिवाशांना आणि दुकानदारांना मोठ्या गैरसोईचा सामना करावा लागतो. पूर्वी पावसाळ्याच्या शेवटी येथे पाणी साठत होते. नंतर मोठा आणि सलग पाऊस आला की पाणी साठू लागले.
आता तर पाऊस पडला की, रात्रीत पाणी साठायला लागले आहे. परिसरात अनेक बांधकामे होत असून काही लोकांनी नैसर्गिकरीत्या पाणी वाहून जाणारे नाले अडवले आहेत. याबाबत सर्व जण बोलतात; परंतू कारवाई मात्र शून्य असते. पावसाळ्यात हा विषय ऐरणीवर येतो. पावसाळा संपला की पुन्हा थंड पडतो. त्यामुळे याची आता सवय झाली आहे, असेच झाले आहे. या परिसरात सिमेंटचे रस्ते करण्याचे काम सुरू आहे. मात्र, या ठिकाणी येऊन काम बंद पडले आहे.
पाइपलाइन करून पाणी बाहेर काढून देण्यासाठी सुरू झालेले कामही आता बंद आहे. त्यामुळे या वर्षीही पावसाळ्यात नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. आंदोलने आणि निवेदने खूप झाली. मात्र, समस्या सुटली नाही. आता तर ती वाढली आहे, कारण पहिल्याच पावसात पाणी साठायला सुरुवात झाली आहे. प्रशासनाने तातडीने या परिसरातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत.
जन्माची कमाई पाण्यात गेली
अनेकांनी शालेय परिसर असल्याने येथे निवासी सदनिका घेतल्या. आपली जन्मभराची कमाई घरे घेण्यासाठी खर्च केली. आता येथे पाणी साठायला लागले असल्याने पावसाळा आला की रात्री जागून काढाव्या लागत असल्याने जन्माची कमाई पाण्यात गेली, अशी भावना नागरिकांची झाली आहे.