सातारा जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेचा पेच, मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 15:39 IST2026-02-13T15:38:27+5:302026-02-13T15:39:42+5:30
भाजपाला वगळून सत्ता स्थापनेबाबत पालकमंत्री शंभूराजे यांची ठाम भूमिका

सातारा जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेचा पेच, मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेबाबत राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेने ठाम भूमिका घेतल्याने भाजपसमोर अडचण निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती दिली. आता मुख्यमंत्री फडणवीस याबाबत काय भूमिका घेतात, तसेच जिल्हा परिषदेवर वर्चस्व मिळवण्यासाठी मंत्री जयकुमार गोरे काय डावपेच आखतात, याची उत्सुकता लागली आहे.
सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपाला वगळून सत्ता स्थापनेबाबत पालकमंत्री शंभूराजे यांची ठाम भूमिका असल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने नुकतीच सातारा शहरातील एका हॉटेलमध्ये शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे ग्रामविकास मंत्रांच्या जिल्ह्यामध्येच भाजपची सत्ता नसल्यास नामुष्की होणार आहे.
वाचा: ‘व्हाया व्हाया’ निरोप आल्यानेच महायुतीचा घोटाळा, वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेची उत्कंठा
या अनुषंगाने भाजपकडून मित्रपक्षांची वाटाघाटी होण्यासाठी आता वरिष्ठ नेत्यांना लक्ष घालावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सत्तास्थापनेचा पेच मांडल्याचे बोलले जात आहे.