तोंड सांभाळून बोला, अन्यथा..; राहुल गांधींवर टीका करणाऱ्या ठाकरे गटाच्या नेत्याला भानुदास माळींनी दिला इशारा
By प्रमोद सुकरे | Updated: May 28, 2025 15:25 IST2025-05-28T15:23:02+5:302025-05-28T15:25:36+5:30
'खरंतर भाजप, आरएसएसला महाविकास आघाडीत फूट पाडायचीय'

तोंड सांभाळून बोला, अन्यथा..; राहुल गांधींवर टीका करणाऱ्या ठाकरे गटाच्या नेत्याला भानुदास माळींनी दिला इशारा
प्रमोद सुकरे
कराड : नाशिक येथील उद्धव ठाकरे शिवसेनेच्या काही शिवसैनिकांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबाबत गंभीर आणि चुकीची वक्तव्ये केली आहेत. खरंतर राहुल गांधी हे देशाचे भावी पंतप्रधान आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलताना त्यांनी तोंड सांभाळून बोलावे अन्यथा आम्ही जशास तसे उत्तर देऊ असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी माध्यमांशी बोलताना दिला.
माळी म्हणाले,काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची सावरकरांच्या बाबतची भूमिका ही स्पष्ट आहे. असे असताना देखील नको तो विषय उकरुन काढून तुम्ही जर त्यांच्या तोंडाला काळे फासण्याची भाषा करीत असला तर आम्ही काय तुमच्या तोंडाकडे बघत बसणार आहे का? तुमच्या पुढच्या भूमिका आम्ही मांडू शकतो हे लक्षात ठेवा.
वाचा- "...तर राहुल गांधींना काळं फासू’’, सावरकरांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा
काँग्रेस पक्षाला १५० वर्षांची परंपरा आहे. तळागाळात काम करणारा हा पक्ष आहे. त्याचे नेतृत्व राहुल गांधी करत असून त्यांना धमकी देण्याची तुमची लायकी नाही. उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या बाबत काय बोलतात का? याचा अगोदर विचार करा. नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आपल्याला पुन्हा आणायचे आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार पुढे घेऊन जायचे आहे. त्यामुळे आघाडी खड्ड्यात गेली अशा प्रकारची वक्तव्ये तुमच्या तोंडातून शोभत नाहीत. असा समाचार ही माळी यांनी 'त्या' शिवसैनिकांचा घेतला.
कारस्थाने ओळखा
खरंतर भाजप व आरएसएसला महाविकास आघाडीत फूट पाडायची आहे. त्यामुळे तेच हे षडयंत्र करीत असून शिवसैनिकांना भडकवण्याचे काम करत आहेत. हे षडयंत्र शिवसैनिकांनी ओळखले पाहिजे असेही माळी एका प्रश्नावर बोलताना म्हणाले.