सातारच्या घटनेचे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात तीव्र पडसाद; लोकशाहीचा गळा घोटला : एकनाथ शिंदे, माझे रक्त निघाले, अजूनही अंग ठणकतय : शंभूराज देसाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 16:54 IST2026-03-24T16:52:22+5:302026-03-24T16:54:36+5:30
अंतरवाली सराटीतील घटनेतही तेच अधिकारी

सातारच्या घटनेचे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात तीव्र पडसाद; लोकशाहीचा गळा घोटला : एकनाथ शिंदे, माझे रक्त निघाले, अजूनही अंग ठणकतय : शंभूराज देसाई
मुंबई : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत दोन सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवत, मंत्र्यांना धक्काबुकी, मारहाण करत लोकशाहीचा गळा घोटला गेला. पोलिस महासंचालक सदानंद दाते, पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी मतदानापासून कोणालाही वंचित ठेवले जाणार नाही, असा शब्द आपल्याला दिला होता. पण, तरीही रोखण्यात आले. जे काही घडले ते आधी कधीही घडलेले नव्हते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली.
शंभूराज देसाई, मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाली, आरोपींसारखी वागणूक त्यांना देण्यात आली, अशी स्थिती आधी कधीही उद्भवली नव्हती, असे सांगत शिंदे यांनी दोषींवर कारवाईची आग्रही मागणी केली.
माझे रक्त निघाले, अजूनही अंग ठणकतय
सातारमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळी पोलिस अधीक्षक तुषार जोशी, पोलिस निरीक्षक अरुण देवकर, सहायक उपनिरीक्षक रमेश गर्जे आणि शंभरएक पोलिसांनी मला धक्काबुक्की केली. मंत्री मकरंद पाटील धक्काबुक्कीत खाली पडले. माझा शर्ट रक्ताने माखला, अशा शब्दात राज्याचे पर्यटन मंत्री व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात व्यथा मांडली.
काही पोलिसांनी मला आरोपीस नेतात तसे फरफटत नेले, काहींनी माझे हात-पाय ओढले, कंबरेत हात टाकून खेचले. मला डायबेटीस आहे. माझे अंग आताही ठणकत आहे, गोळ्या खाव्या लागत आहेत, असे देसाई म्हणाले. पोलिस अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करा, न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली.
विधान परिषदेत राष्ट्रवादीचे (अजित पवार) विक्रम काळे, संजय खोडके, शिंदेसेनेच्या मनीषा कायंदे यांनीही सातारप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली. विधानसभेत शिंदेसेनेचे सदस्य अर्जुन खोतकर यांनी हल्लाबोल केला. मंत्री मकरंद पाटील यांनी त्या दिवशीचा घटनाक्रम सांगताना पोलिसांच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
निर्देशांचे पालन करू म्हटले पण स्थगिती मिळाली
विधान परिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे जे निर्देश दिले आहेत, त्याचे तंतोतंत पालन सरकार करेल, अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली होती. पण, दुपारी सभापतींनी या निर्देशांनाच स्थगिती दिल्याने तंतोतंत पालनाची ग्वाही हवेत विरली.
कायदा कोणी तोडला, माणसे कोणी घुसवली? : जयकुमार गोरे
अध्यक्षपद निवडणुकीच्या वेळी जिल्हा परिषद परिसरात तीन-चार हजार लोक घुसवून कायदा व सुव्यवस्था स्थिती कोणी धोक्यात आणली, असा सवाल करत ग्रामविकास मंत्री आणि शिंदेसेनेच्या टीकेचे मुख्य लक्ष्य असलेले जयकुमार गोरे यांनी नाव न घेता मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, आमचेही म्हणणे ऐकून घ्या. वास्तव समजून न घेता निर्देश दिले जात आहेत, या शब्दात त्यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विषयीही नाराजी व्यक्त केली. कायद्याचे उल्लंघन कोणी केले, याचीही चौकशी झाली पाहिजे. भाजपवर टीका केली जात आहे. पण, भाजपचा कोणताही दोष नाही, असे ते म्हणाले.
अंतरवाली सराटीतील घटनेतही तेच अधिकारी
मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनस्थळी पोलिस लाठीमार झाला तेव्हा आताचे सातारचे जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी हे जालनाचे पोलिस अधीक्षक होते. याकडे शिंदेसेनेचे मंत्री, आमदारांनी लक्ष वेधले.
- छत्रपतींच्या राज्यात म्हणजे सातारमध्ये निजामाचे राज्य आले आहे का? लोकशाही शिल्लक आहे की नाही? - आ. हेमंत पाटील (शिंदेसेना).
- मंत्रीच सुरक्षित नसतील तर सामान्यांची काय कथा? राज्यात आणीबाणी आहे का? - आ. अर्जुन खोतकर (शिंदेसेना).
- आयपीएस, आयएएस अधिकाऱ्यास निलंबित करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. चुकीचा पायंडा पडू नये, उपसभापतींच्या निर्देशांना स्थगिती द्यावी. - प्रवीण दरेकर (भाजप).