अध्यक्ष निवडीच्या राजकीय नाट्यावर नवे ट्विस्ट; राष्ट्रवादी-शिंदेसेनेचा पोलिसांवर आरोप, ते म्हणतात, ..म्हणून उचलले’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 17:18 IST2026-03-24T17:18:17+5:302026-03-24T17:18:43+5:30
जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी रजेवर

अध्यक्ष निवडीच्या राजकीय नाट्यावर नवे ट्विस्ट; राष्ट्रवादी-शिंदेसेनेचा पोलिसांवर आरोप, ते म्हणतात, ..म्हणून उचलले’
सातारा : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी झालेल्या राजकीय नाट्यावर अद्याप पडदा पडला नसून अनेक ट्विस्ट येऊ लागले आहेत. देसाई आणि मांडवे यांचाच निवड प्रक्रिया उधळून लावण्याचा कल असल्याचे पोलिसांनी ‘एसआयटी’च्या अहवालात म्हटल्याने खळबळ उडणार आहे. दरम्यान, घायाळ राष्ट्रवादी-शिंदेसेना भाजपला घेरण्याच्या प्रयत्नात आहे. आमदार शशिकांत शिंदे यांनी नवनिर्वाचित अध्यक्षा प्रिया शिंदे यांचे ओबीसी प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप केला आहे, तर दुसरीकडे खासदार नितीन पाटील यांनी अध्यक्षपदाच्या फेरनिवडीसाठी न्यायालयात दाद मागण्याचा इरादा स्पष्ट केला आहे.
सर्व घडामोडींचा अहवाल सातारा पोलिसांनी एसआयटीला सादर केला आहे. त्यात अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना पराभवाची खात्री झाल्यानेच ते आक्रमक होऊन मतदान प्रक्रिया उधळण्याच्या मानसिकतेत होते. त्यांना समजावूनही आक्रमक पवित्रा कायम होता. त्यामुळेच दोन्ही सदस्यांना अटक करणे अत्यावश्यक ठरले, असे अहवालात नमूद केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी (अजित पवार)चे जिल्हा परिषदेचे सदस्य बापूसाहेब ऊर्फ दिनकर शिंदे यांनी ‘माझे अपहरण झालेच नाही’ असा जबाब स्थानिक गुन्हे शाखेकडे नोंदवला. मी स्वत:हून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत गेलो होतो. माझ्या मुलावरील केसेस मागे घेण्याचे त्याला आश्वासन मिळाले असेल. त्यामुळे त्याने तक्रार दिली असावी. माझ्या मुलाचा काहीही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बापूसाहेब शिंदे यांच्यासाेबत राष्ट्रवादी (अजित पवार)चे खासदार नितीन पाटीलही वकील घेऊन आले होते. खासदार पाटील यांनी अध्यक्ष-उपाध्यक्षपदांची निवडणूक बेकायदेशीर झाली आहे. पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे वैध बाजू तपासून फेरनिवडीच्या संदर्भाने न्यायालयीन प्रक्रियेत लवकरच दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले.
न्यायालयीन चौकशी करा : पृथ्वीराज चव्हाण
शिंदेसेना आणि राष्ट्रवादीचे स्पष्ट बहुमत असतानाही भाजपने सत्ता बळकावली. हा प्रकार ‘लोकशाहीवरील काळा डाग’ आहे. याची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. तसेच या घटनेचे पडसाद राज्य सरकारच्या स्थिरतेवरही उमटू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी रजेवर!
जिल्हा परिषद निवडीवरून विधानसभेत पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली असतानाच अधीक्षक तुषार दोशी हे सध्या रजेवर गेले असल्याचे समोर आले आहे. पोलिस अधीक्षक अजून किती दिवस रजेवर आहेत, हे मात्र गुलदस्त्यात आहे.