Satara Politics: जयंत पाटील यांना ‘सुरेशबाबां’कडून भाजपची ऑफर !, शेतकरी मेळाव्यातील राजकीय फटकेबाजी चर्चेत
By प्रमोद सुकरे | Updated: June 5, 2025 14:30 IST2025-06-05T14:27:53+5:302025-06-05T14:30:57+5:30
दिलीपराव देशमुखांनाही काढला चिमटा !

Satara Politics: जयंत पाटील यांना ‘सुरेशबाबां’कडून भाजपची ऑफर !, शेतकरी मेळाव्यातील राजकीय फटकेबाजी चर्चेत
प्रमोद सुकरे
कराड : आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर नुकताच एक भव्य शेतकरी मेळावा झाला. विशेष म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे होते. त्यामुळे साहजिकच कृषिक्षेत्रातील मार्गदर्शनाबरोबरच येथे राजकीय फटकेबाजीही पाहायला मिळाली. त्यात जयंत पाटील यांनी आमदार डॉ. अतुल (बाबा) भोसले यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश (बाबा) भोसले यांनी चक्क जयंतराव पाटील यांना भाजपमध्ये प्रवेशाची दिलेली ऑफर चांगलीच चर्चेत आली आहे.
शिवनगर (ता. कराड) येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र ५ तालुक्यांचे आहे. कराडसह सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, कडेगाव, खानापूर या तालुक्यात याचे सभासद विखुरलेले आहेत. त्यामुळे कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत येथील नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरते, तर कृष्णा कारखान्याच्या राजकारणाचा परिणाम या तालुक्यातील इतर निवडणुकींवर नेहमीच झाला आहे.
खरं तर कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा शेतकरी मेळावा आयोजित केला होता. पण या मेळाव्यास उपस्थित असणारे प्रमुख पाहुण्यांनी भाषणात एकमेकांना मारलेल्या कोपरखळ्या व काढलेले चिमटे सध्या कार्यक्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे.
जयंतराव पाटील काय म्हणाले..
खरं तर नुकत्याच राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात आम्ही भरपूर प्रयत्न केले; पण आमचा पराभव झाला. इथल्या मतदारांनी डॉ. अतुल भोसले यांच्यासारखा तरुण नेता महाराष्ट्राला दिला आहे. पूर्वी त्यांना अपयश आले असले तरी आता ते यशस्वी झाले. डॉ.अतुल भोसले व डॉ. सुरेश भोसले यांची वागण्याची, बोलण्याची पद्धत अतिशय चांगली आहे. ते दोघे दिल्लीपर्यंत सगळ्यांना हाताळू शकतात, असा मला विश्वास आहे. त्यामुळे डॉ. अतुल भोसले यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाला माझ्या नेहमीच शुभेच्छा आहेत.
सुरेश भोसले यांच्याकडून ऑफर..
खरं तर भाजप सरकारने सत्तेवर आल्यानंतर सहकारी साखर कारखानदारीबाबत अनेक चांगले निर्णय घेतले. जे निर्णय यापूर्वी २५ वर्षात घेतले नव्हते, ते निर्णय त्यांनी घेतले. त्यामुळे आता जयंतराव पाटील यांचे विचारही हळूहळू बदलतील, असे मला वाटते. ते जर इकडे आले, तर अजून बरे होईल, असे मला एकट्याला नव्हे, तर अनेकांना वाटते. सुरेशबाबा यांच्या या विधानावर उपस्थितांनी टाळ्या व शिट्ट्या वाजवत प्रतिसाद दिला.
दिलीपराव देशमुखांनाही काढला चिमटा !
या शेतकरी मेळाव्याला आमदार डॉ. अतुल भोसले यांचे सासरे व माजी क्रीडामंत्री दिलीपराव देशमुखही आवर्जून उपस्थित होते. मात्र डॉ. सुरेश भोसले यांनी आपल्या भाषणात त्यांनाही चिमटा काढण्याची संधी सोडली नाही. सत्ता असो वा नसो काही लोक नेहमीच काम करीत राहातात. दिलीपराव देशमुख व परिवार तेच काम करत आला. दिलीपराव, तर प्रमुख सत्तेच्या प्रवाहात राहिले आहेत. ते जर इकडे आले तर अजून जोरात काम होईल, असे म्हणताच उपस्थितांच्यात खसखस पिकली.