सातारकरांना रोज मिळणार पाणी; महादरे तलाव भरला, ‘कास’ भरण्याच्या मार्गावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 13:27 IST2025-06-18T13:26:41+5:302025-06-18T13:27:02+5:30
कपातीचे संकट टळणार

सातारकरांना रोज मिळणार पाणी; महादरे तलाव भरला, ‘कास’ भरण्याच्या मार्गावर
सातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरणातील साठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे धरण लवकरच भरण्याच्या मार्गावर आहे. शिवाय पश्चिमेकडील हत्ती व महादरे ही तळीदेखील तुडुंब भरली आहेत. त्यामुळे शहरात दीड महिन्यापासून सुरू असलेली पाणीकपात आठ दिवसांत बंद करण्याचा निर्णय प्रशासन घेणार आहे.
सातारा पालिकेने कास योजनेच्या पाणीपुरवठ्यात ७ मेपासून कपात केली आहे. पालिकेने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार कास योजनेवरील सर्व पेठांचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवला जात आहे. दरवर्षी साधारण दोन ते अडीच महिने सातारकरांना पाणीकपातीचा त्रास सहन करावा लागतो; परंतु, यंदा मे महिन्यातच वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. शिवाय पाच दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात मान्सूनचा जोरही वाढला आहे. परिणामी, धरणे तसेच तलावांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
पश्चिमेकडील कास धरण क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला असून, ६१ फूट क्षमता असलेल्या या धरणात आता ५६ फूट पाणीसाठा झाला आहे. महादरे तळेदेखील महिनाभर आधीच तुडुंब भरून वाहू लागले आहे. त्यामुळे शहरात सुरू असलेली पाणीकपात बंद करण्याबाबत पाणीपुरवठा विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. येत्या आठ दिवसांत कपात बंद करून पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल, अशी माहिती पाणीपुरवठा अभियंता शहाजी वाठारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
दृष्टिक्षेपात पाणीसाठा
- जुन्या कास तलावाची साठवण क्षमता : २५ फूट
- नवीन धरणातील साठवण क्षमता : ६१ फूट
- सध्याचा पाणीसाठा : ५६ फूट
- प्रतिदिन होणारा पुरवठा : ७५ लाख लिटर
मान्सून सक्रिय झाल्याने कास धरण वेळेपूर्वीच भरण्याच्या मार्गावर आहे. सध्या कास योजनेच्या मुख्य जलवाहिनीच्या एअर वॉल्व्हला गळती लागली आहे. ती काढण्याचे काम प्रगतिपथावर आहे. काम पूर्ण होताच पाणीकपात बंद करून शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत व नियमित केला जाईल. - अभिजित बापट, मुख्याधिकारी, सातारा