वाई-खंडाळा-महाबळेश्वरात भाजपचे मनसुबे धुळीस!, मकरंद पाटील यांची पॉवर गेम यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 18:29 IST2026-02-10T18:28:22+5:302026-02-10T18:29:25+5:30
वाईतही आबांचा करिश्मा...

संग्रहित छाया
सचिन काकडे
सातारा : राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार)ने आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत मंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी (अजित पवार)ने भाजपच्या आक्रमक रणनीतीला चोख प्रत्युत्तर देत तीनही तालुक्यांत भाजपचे मनसुबे धुळीस मिळवले.
या निवडणुकीत मतदारसंघातील एकूण ९ गट आणि १८ गणांपैकी ६ गट व ११ गणांवर राष्ट्रवादी (अजित पवार)ने कब्जा मिळवला, तर सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपला केवळ २ गट आणि ५ गणांवर समाधान मानावे लागले.
महाबळेश्वरात भाजपचा भोपळा..
महाबळेश्वर तालुक्यात भाजपने पक्षप्रवेशांचा धडाका लावत मोठी तयारी केली होती, मात्र निकाल पाहता भाजप येथे पूर्णपणे फेल ठरली. भिलार गटात मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी (अजित पवार)ने गट आणि भिलार व मेटगुताड या दोन्ही गणांवर वर्चस्व राखले. तळदेव गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदेसेनेने भाजपला धक्का देत विजय मिळवला. भाजपची सर्व रणनीती येथे सपशेल अपयशी ठरली असून, त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.
खंडाळ्यात राष्ट्रवादी (अजित पवार)ची किमया
खंडाळ्यात मंत्री जयकुमार गोरे यांनी विशेष लक्ष घातल्याने भाजप मुसंडी मारणार असे चित्र होते; पण मकरंद पाटील यांच्या चक्रव्यूहात भाजप अडकली. राष्ट्रवादी (अजित पवार)ने स्थापनेनंतर प्रथमच पंचायत समितीच्या ६ पैकी ४ जागा जिंकत भाजपला बॅकफूटवर धाडले. तर ३ पैकी फक्त १ गट भाजपला राखता आला. या निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा मकरंद पाटील यांच्याच नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले.
वाईतही आबांचा करिश्मा...
वाई तालुक्यात मकरंद पाटील यांचा गड फोडण्यासाठी भाजपने सर्वशक्तीनिशी प्रयत्न केले होते. मंत्री जयकुमार गोरे स्वत: या रणांगणात उतरल्याने येथील निवडणूक रंगतदार होणार असे चित्र होते. परंतु ४ पैकी ३ गट राष्ट्रवादी (अजित पवार)ने खिशात घातले, तर ८ पैकी ५ गणांत राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. मोठ्या घोषणा आणि रणनीती करूनही भाजपला येथे केवळ १ गट आणि ३ गणांवर समाधान मानावे लागले.
मतदारसंघातील निकालाचे पक्षनिहाय चित्र
पक्ष - गट - गण
एकूण जागा - ०९ - १८
- राष्ट्रवादी (अजित पवार) - ०६ - ११
- भाजप - ०२ - ०५
- शिंदेसेना - ०१ - ०२
राष्ट्रवादी (अजित पवार)च्या विजयाची कारणे
१. मतदारसंघात मकरंद पाटील यांचा जनसंपर्क आणि विकासकामे
२. प्रत्येक गणात आणि गटात कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे
३. कामांच्या माध्यमातून जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यात यश
भाजपच्या पिछाडीची कारणे
१. केवळ पक्षप्रवेशावर भर दिला, मात्र बूथ पातळीवर मते वळवण्यात अपयश
२. नवीन कार्यकर्त्यांना संधी तर निष्ठावंतांची झालेली नाराजी
३. मकरंद पाटील यांच्या विरोधात केलेली आक्रमक टीका मतदारांना रुचली नाही