Sangli ZP: 'आम्ही ४० वर्षे राजकारणात, आम्हाला कायदा शिकवू नका'!; राष्ट्रवादीचे नेते पालकमंत्र्यांवर गरजले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 18:26 IST2026-03-10T18:25:24+5:302026-03-10T18:26:55+5:30
प्रदेश नेतृत्वाला झुगारून पाठिंब्याचा निर्णय, गटनेता नोंदणी पूर्ण

Sangli ZP: 'आम्ही ४० वर्षे राजकारणात, आम्हाला कायदा शिकवू नका'!; राष्ट्रवादीचे नेते पालकमंत्र्यांवर गरजले
सांगली : 'आम्ही गेल्या ४० वर्षांपासून राजकारणात आहोत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला व्हीपचा कायदा शिकवू नये', असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) नेत्यांनी दिला. पाठिंब्याच्या विषयावरून त्यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांवरही हल्लाबोल केला. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात गटनेता नोंदणीसाठी आले असता, ते पत्रकारांसोबत बोलत होते.
माजी खासदार संजय पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तम्मनगौडा रवी पाटील आदी यावेळी उपस्थित होते. त्यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना भेटून गटनेते पदावर राजेश्वरी नाईक यांच्या नावाच्या नोंदणीसाठी अर्ज दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील हेदेखील उपस्थित होते. तत्पूर्वी निशिकांत पाटील वगळता अन्य नेत्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.
संजय पाटील, विलासराव जगताप, अजितराव घोरपडे म्हणाले, 'आम्हाला जिल्हा परिषदेत अध्यक्षपद देईल, त्याला सत्तास्थापनेत पाठिंबा देऊ. पालकमंत्र्यांनी व्हीपचा कायदा आम्हाला शिकवू नये. तो आम्हाला चांगला कळतो. त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही.'
संजय पाटील म्हणाले, 'राष्ट्रवादीच्या गटनेत्याच्या नोंदणी प्रक्रियेत अडचण आली होती. आज पुन्हा काही अडचण येऊ नये यासाठी एकत्र जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो. सत्तास्थापनेचा निर्णय आम्ही सर्व नेते सामुदायिकरीत्या घेणार आहोत. त्याच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. दोन दिवसांत त्याचा निर्णय होईल. पाठिंब्याविषयी आमच्यापैकी कोणत्याही नेत्यावर दबाव नाही. आम्ही सर्वांनी ३०-४० वर्षे जिल्ह्याचे राजकारण केले आहे.'
जगताप म्हणाले, 'जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार असे पालकमंत्री सतत म्हणत आहेत. पण भाजपचे किती सदस्य आहेत याचा विचार त्यांनी करावा. सत्ता स्थापण्याइतपत संख्याबळ त्यांच्याकडे आहे का? भाजपचा अध्यक्ष होणार हे पालकमंत्र्यांचे स्वत:चे मत आहे. स्वत:चे संख्याबळ नसलेल्या चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही.
आपल्याच पक्षातील लोकांना सांगावे. आमच्या पक्षात आम्ही सक्षम आहोत. तुमच्यापेक्षा आम्हाला कायदा चांगला समजतो. दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी आम्हाला सांगण्याची गरज नाही. सत्ता स्थापनेबाबत वरिष्ठांकडून काही निर्णय आल्यास आम्ही जिल्ह्यातील सर्व नेते सामुदायिक निर्णय सांगू.'
'जिल्हाध्यक्षांनी आमचा बाजार करु नये'
संजय पाटील म्हणाले, 'राष्ट्रवादीच्या गटनेते पदावर राजेश्वरी नाईक यांची निवड निश्चित केली होती. मात्र, पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर हा अधिकार स्वत:कडे घेतला होता. तो आम्हाला पसंत पडला नाही. आमच्या परस्पर जाऊन आमचा बाजार त्यांनी करु नये. इतके वेडे आम्ही नाही आहोत.'