ताकारी योजनेचे तिसरे आवर्तन बुधवारपासून

By Admin | Updated: April 1, 2015 00:03 IST2015-03-31T22:54:07+5:302015-04-01T00:03:37+5:30

शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज द्यावेत : पाटबंधारे विभागाचे आवाहन

Third recurrence of the Tatkari scheme since Wednesday | ताकारी योजनेचे तिसरे आवर्तन बुधवारपासून

ताकारी योजनेचे तिसरे आवर्तन बुधवारपासून

देवराष्ट्रे : अवकाळी पाऊस पडल्याने ताकारी उपसा सिंचन योजनेचे लांबलेले उन्हाळी आवर्तन आजपासून (बुधवारी) सुरू होत आहे. हे पाणी योजनेच्या मुख्य कालव्यातून १०७ कि.मी.पर्यंत पुढे जाणार आहे. तरीही सुरुवातीच्या गावांना अगोदर पाणी देण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे आवर्तन सलग १५ दिवस सुरू राहणार आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.ताकारी उपसा सिंचन योजनेतून दुष्काळी भागाला वरदान मिळाले आहे. मात्र सुरूवातीला वीज बिलाच्या थकबाकीपोटी योजनेचे वीज कनेक्शन तोडले होते. ताकारीच्या प्रशासनाकडे वीज बिलासाठीही पैसे नसल्याने कारखान्यांकडून पैसे जमा झाल्यानंतर महावितरणला वर्ग करण्यात आले. सध्या विक्रमी वसुली झाली असून योजनेकडे ३.५५ कोटी रुपये शिल्लक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.ताकारी योजनेचा टप्पा क्र. १ व टप्पा क्र. २ मधून ८ विद्युत पंपांद्वारे पाणी उचलण्यात येणार आहे. हे पाणी मुख्य कालव्यातून १०७ कि.मी.पर्यंत नेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच पाणी वितरण ० कि.मी.पासून सुरू करून २० कि.मी.पर्यंत, २०-५६ आणि ५६ ते १०० कि.मी.पर्यंत वितरित करण्यात येणार आहे.
उन्हाळी आवर्तनासाठी शेतकऱ्यांनी सात क्रमांकाचा अर्ज भरून ऊस, केळी, द्राक्षबाग व इतर पिकांसाठी पाणी मागणी अर्ज करणे गरजेचे आहे. त्यामुळे पाणी सुरू करण्यास विलंब होणार नाही. तरी लाभधारक शेतकऱ्यांनी योजनेच्या कार्यालयात पाणी मागणी अर्ज करावेत, असे आवाहन पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे. (वार्ताहर)


विक्रमी वसुली
ताकारी उपसा योजनेमुळे दुष्काळी भागाला जीवदान मिळाले आहे. सुरुवातीला थकबाकीपोटी या योजनेचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. प्रशासनाकडे कारखान्यांकडून पैसे जमा झाल्यानंतर ते महावितरणकडे वर्ग करण्यात आले. विक्रमी वसुली झाली असून, सुमारे साडेतीन कोटी रुपये शिल्लक असल्याचे योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Third recurrence of the Tatkari scheme since Wednesday