शिंदेसेना नाराज, राष्ट्रवादीशी दोस्ताना; सांगली जिल्हा परिषदेत भाजपला वगळून सत्ता स्थापनेच्या हालचाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 13:16 IST2026-02-13T13:16:12+5:302026-02-13T13:16:58+5:30
सत्तेचे गणित कसे असणार?

शिंदेसेना नाराज, राष्ट्रवादीशी दोस्ताना; सांगली जिल्हा परिषदेत भाजपला वगळून सत्ता स्थापनेच्या हालचाली
सांगली : जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेचा तिढा कायम असून, महायुतीअंतर्गत असलेले मतभेद समोर आले आहेत. पर्यटनमंत्री तसेच शिंदेसेनेचे सांगली जिल्ह्याचे संपर्कमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपने सत्तेसाठी गृहीत धरल्याबाबत उघड नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षानेही भाजपला प्रतिसाद दिलेला नाही. महायुतीत मतभेद निर्माण झाले असतानाच भाजपला वगळून अन्य प्रमुख पक्षांची आघाडी करीत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत छुप्या बैठकांना सुरुवात झाली असून, आमदार जयंत पाटील यांनी यासाठी मोर्चेबांधणी केली आहे.
सांगली जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. याशिवाय महायुती व महाविकास आघाडीचे मित्रपक्ष एकत्र आले तरीही त्यांचे संख्याबळ काठावरच येते. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी खेचाखेची व नव्या खेळ्यांना सुरुवात झाली आहे. तिकीटवाटपात भाजपने शिंदेसेना व अजित पवार गटाला फारसा प्रतिसाद दिलेला नसल्याने दोन्ही पक्ष आता तोच मुद्दा पकडून भाजपच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त करीत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपचे नेते सोयीची भूमिका घेत असल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
एकीकडे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीबाबत मित्रपक्षांशी चर्चा झाल्याचे सांगत असतानाच शंभूराज देसाई यांनी अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे भाजप व मित्रपक्षांचे सूर जुळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याच गोष्टीची संधी साधत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील हे शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाशी मैत्रभाव दाखवत सत्तास्थापनेची गणिते जुळवत आहेत. यासाठी छुप्या खेळ्या सुरू झाल्या आहेत. दोन दिवसांत राष्ट्रवादी अजित पवार पक्ष व शिंदेसेना भूमिका जाहीर करणार आहे.
सत्तेचे गणित कसे असणार?
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या १८, काँग्रेसच्या ११ व उद्धवसेनेची एक जागा अशी आघाडीची गोळाबेरीज ३० च्या घरात जाते. महायुतीची गोळाबेरीच ३१ होते, मात्र महायुतीत वाद होत असल्याने सत्तेचे समीकरण जुळलेले नाही. जयंत पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी व शिंदेसेनेला एकाच मांडवाखाली आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. यातील एका पक्षाशी सूर जुळले तरीही सत्तेचा सोपान चढता येतो म्हणून मोर्चेबांधणी होत आहे. त्यांची ही खेळी यशस्वी झाली तर भाजपला वगळून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली जाऊ शकते.