Sangli: पलूसमध्ये शाळकरी मुलाचा डंपरखाली चिरडून मृत्यू, नातेवाइकांचा आक्रोश हृदय पिळवटणारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 18:58 IST2026-01-28T18:54:51+5:302026-01-28T18:58:47+5:30
शाळेला जाताना सायकलच्या चाकातील हवा गेली, हवा भरुन पुढे जातानाच काळाने झडप घातली. चालक फरार

Sangli: पलूसमध्ये शाळकरी मुलाचा डंपरखाली चिरडून मृत्यू, नातेवाइकांचा आक्रोश हृदय पिळवटणारा
पलूस: पलूस शहरातील अमणापूर रस्त्यावरती निष्काळजी व बेदरकार डंपरचालकाने नववीत शिकणाऱ्या १२ वर्षीय शाळकरी मुलाला चिरडले. या अपघातात मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. मुलाचे अर्णव अमित पवार (रा. कुसमेश्वर, ११ वी तालीम, पलूस) असे आहे. ही घटना मंगळवार दि. २७ रोजी सकाळी १० च्या सुमारास घडली. घटनेची फिर्याद चुलते अमोल बाळासाहेब पवार (वय ३७, रा. पलूस) यांनी पलूस पोलिसात दिली आहे. पोलिसांनी अज्ञात डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, पलूस येथील कुसमेश्वर ११ वी तालीम येथे राहणारा एलके विद्यालयात शिक्षण घेत असणारा अर्णव हा शाळेत निघाला होता. पलूस–आमणापूर रस्त्याने जात असताना श्री बाजार जवळ येताच सायकलमधील हवा गेल्याचे अर्णवच्या लक्षात आले. त्याने लगेच सायकलवरून खाली उतरून बाजूला असलेल्या दुकानात सायकलच्या चाकात हवा भरली व पुन्हा सायकलवर बसत असताना अमणापूरकडून येणाऱ्या भरधाव डंपरने जोराची धडक दिल्याने अर्णव डंपरच्या पाठीमागील डाव्या चाकाखाली गेला. त्याच्या शरीरावरून व डोक्यावरून चाक गेल्याने या अपघातात जागीच ठार झाला.
या घटनेची माहिती मिळताच मोठा जनसमुदाय घटनास्थळी जमा झाला. नागरिक या घटनेबाबत संताप व्यक्त करत होते. पोलिसांनी वेळीच धाव घेत जमावाला पांगवून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून डंपर ताब्यात घेतला आहे. अर्णवच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. अर्णव आता पुन्हा परत येणार नसल्याचे समजताच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. घटनास्थळी आई, वडील व नातेवाइकांचा आक्रोश काळीज हेलावणारा होता.
भरधाव वाहनांना आवर घालण्याची मागणी
अपघातानंतर माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. डंपरचालकाने थांबून मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पलायन केले. या निष्काळजीपणामुळे आणि बेदरकार वाहनचालकांमुळेच शहरातील रस्ते मृत्यूचे सापळे बनत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. पलूस शहरातील मुख्य रस्त्यांवरून अवजड वाहनांची भरधाव वाहतूक सातत्याने सुरू असते. शहरातील अरुंद रस्ते सततची वाहतूक कोंडी यामुळे शाळा, बाजारपेठ जाणाऱ्या नागरिकांना रोज अपघाताचा सामना करावा लागत आहे.