Sangli ZP Election Voting 2026: जनता चुकीच्या प्रवृत्तीला योग्य जागा दाखवेल - जयंत पाटील; साखराळे येथे बजावला मतदानाचा हक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 14:19 IST2026-02-07T14:18:57+5:302026-02-07T14:19:36+5:30
प्रतिमा मलिन करण्यासाठीच भाजप प्रवेशाच्या वावड्या

Sangli ZP Election Voting 2026: जनता चुकीच्या प्रवृत्तीला योग्य जागा दाखवेल - जयंत पाटील; साखराळे येथे बजावला मतदानाचा हक्क
युनूस शेख
ईश्वरपूर : सांगली जिल्हा परिषदेसह विविध तालुक्यातील पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्ष, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची महाविकास आघाडी विजयी होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आ.जयंत पाटील यांनी साखराळे येथे मतदानाचा हक्क बजावताना व्यक्त केला.
जयंत पाटील यांनी साखराळे येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी लोकं चुकीच्या प्रवृत्तीला योग्य जागा दाखवतील. मधल्या काळात स्व. राजारामबापू पाटील यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत तसेच त्यांच्या प्रतिमेवर केलेल्या करणीबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, बापूंबद्दल सामान्य जनतेच्या मनात प्रचंड आस्था आहे, ते पदोपदी दिसले आहे. जनतेचा बापूंशी प्रचंड संपर्क आणि संवाद होता. त्यामुळे या चुकीच्या प्रवृत्तीला जनता जागा दाखवेल. बापूंचे अनुयायी मतदानातून उत्तर देतील.
वारंवार भाजप प्रवेशबाबत उठवल्या जाणाऱ्या वावड्यांबाबत प्रश्न विचारला असता जयंत पाटील म्हणाले, अशी वक्तव्ये वारंवार केली गेली पण तसे काही झाले का ? हा सगळा प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असतो. जनतेची खात्री पटलेली आहे. त्यामुळे अशा विधानांमुळे जनतेच्या मनावर परिणाम होत नाही.
ते म्हणाले, काही ठिकाणी आम्ही आणि अजित दादांचा पक्ष एकत्र लढत आहोत.त्यामुळे निकाल चांगलाच लागेल.राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची आणि अजित दादांच्या राष्ट्रवादीची काही ठिकाणी आघाडी आहे. सोलापूर, पुणे अशा अनेक ठिकाणी आम्ही सोबत लढलो आहोत. काही ठिकाणी तर आमचे उमेदवार घड्याळाच्या चिन्हांवर उभे आहेत. निकाल चांगलाच लागेल असा विश्वास आहे.
अमेरिकेबद्दलच्या नव्या धोरणावरही जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, केंद्र सरकारने आपल्या देशातील शेतकऱ्यांसाठी काटेरी वाट निर्माण केली आहे. तर अमेरिकेच्या शेतकऱ्यांसाठी गालिचा अंथरला आहे. नव्या धोरणानुसार अमेरिकेतील त्यांचा माल शुन्य टक्के कराने आपल्या देशात आणता येईल. परंतु भारतातील शेतकऱ्यांना अमेरिकेत जर माल पाठवायचा असेल तर त्याला १८ टक्के कर भरावा लागेल.
असंच एकदा फ्रांस देशात झाले होते. अनेक दुग्धजन्य पदार्थ फ्रान्समध्ये कमी दरात आयात व्हायचे. याने फ्रान्सच्या दुग्ध व्यवसायावर परिणाम झाला होता. त्यानंतर त्यांना विविध उपाययोजना कराव्या लागल्या होत्या असा दाखला देतानाच त्यांनी या विषयावर संसदेत चर्चा व्हायला हवी, केंद्र सरकारने याबाबत देशातील शेतकऱ्यांना समजावून सांगितले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.