सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला; अनेक ठिकाणचे बंधारे, पूल पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 13:27 IST2025-05-28T13:27:03+5:302025-05-28T13:27:22+5:30
सततच्या पावसामुळे द्राक्ष, डाळिंबासह उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला; अनेक ठिकाणचे बंधारे, पूल पाण्याखाली
सांगली : जिल्ह्यातील पावसाचा मुक्काम कायम असून दिवसभर उघडीप दिल्यानंतर रात्री पुन्हा पावसाचा जोर वाढला. पलूस, कडेगाव, आटपाडी तसेच सांगली, मिरज शहरांत रात्री पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
दुष्काळी भागासह सर्वच तालुक्यांत जोरदार पाऊस सुरू झाला आहे. पलूसला अडीच तास मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे आंधळी येथील फरशी पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. वाळवा तालुक्यातील संततधार पावसाने बोरगाव आणि तासगावला जोडणारा बोरगाव ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेला आहे. सततच्या पावसामुळे द्राक्ष, डाळिंबासह उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
सांगली, मिरज शहरांत दिवसभर पावसाची उघडीप होती. मात्र, रात्री अचानक पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. पावसामुळे दोन्ही शहरे जलमय झाली आहेत. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत पावसाने दीर्घकाळ मुक्काम केल्याने शेतांत पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे सर्वत्र शेतीच्या कामांचा खोळंबा झाला आहे.