शिंदे-फडणवीस सरकार फक्त आपले आमदार कसे टिकवायचे या विवंचनेत आहे - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 16:34 IST2023-01-29T16:33:42+5:302023-01-29T16:34:40+5:30
शिंदे-फडणवीस सरकार फक्त आपले आमदार कसे टिकवायचे या विवंचनेत आहे अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

शिंदे-फडणवीस सरकार फक्त आपले आमदार कसे टिकवायचे या विवंचनेत आहे - अजित पवार
प्रताप बडेकर
कासेगाव (सांगली) : सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकार कडून जिल्हा नियोजन समितीचा फक्त २० टक्के निधी खर्च झाला असून हे सरकार फक्त आपले आमदार कसे टिकवायचे या विवंचनेत आहे.असा घणाघात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. ते कासेगाव ता.वाळवा येथील क्रांतीवीरांगना इंदूताई पाटणकर यांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या उदघाटन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, आ. मानशिंग नाईक,विशाल पाटील,देवराज पाटील,डॉ. भारत पाटणकर हे उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते अजित पवार पुढे म्हणाले की, हे सरकार महिलांना मंत्रिपद देऊ शकले नाही. आपले सरकार व आपले आमदार कसे टिकवायचे याचाच विचार तर ते करत आहेत.राज्यातील लोकांचे त्यांना काही देने-घेणे नाही.आ. जयंत पाटील म्हणाले की, महापुरुषांचा अपमान होत असून वेगवेगळे वक्तव्य केली जात आहेत. तरी सुद्धा या गोष्टींना लोकांच्यातुन म्हणावा तसा विरोध होत नाही. समान नागरी कायदा बाबत काही गोष्टी कानावर येऊ लागल्या आहेत. मात्र लोकांनी याबाबत सावध राहिले पाहिजे.