Sangli ZP: जयंत पाटलांच्या बेरजेच्या राजकारणाला चिंतेचे ग्रहण; अध्यक्षपदाचा तिढा राष्ट्रवादीच्या हाती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 17:58 IST2026-02-20T17:57:17+5:302026-02-20T17:58:37+5:30
राष्ट्रवादीमध्ये काही मतभिन्नता असल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपला गट अद्यापही स्थापन केला नाही

Sangli ZP: जयंत पाटलांच्या बेरजेच्या राजकारणाला चिंतेचे ग्रहण; अध्यक्षपदाचा तिढा राष्ट्रवादीच्या हाती
अशोक पाटील
ईश्वरपूर : जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा तिढा आजही कायम आहे. भाजप, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आपला गट स्थापन केला आहे. सत्तेच्या सारीपाटात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अध्यक्षपद कमळाच्या हाती देण्याचा डाव टाकला आहे. तर आ. जयंत पाटील यांनी काँग्रेस, उद्धवसेनेची आघाडी करून राष्ट्रवादीच्या निर्णयाकडे लक्ष ठेऊन आहेत. याच पार्श्वभूमीवर सत्ता स्थापनेची चिंता आ. पाटील यांना लागली आहे.
येणाऱ्या अधिवेशनानंतरच जिल्हा परिषद सत्तेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. भाजपचे बलाबल १६ असल्याने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजचा गट स्थापन केला आहे. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बलाबल १८ आहे. आमदार जयंत पाटील यांनी आपला गट स्थापन केला आहे. राज्यात महायुतीची सत्ता असल्याने भाजप १६ आणि शिवसेना ७, जनस्वराज्य १, रयत क्रांती शेतकरी संघटना १ असे एकूण २५ सदस्य एकत्रित येण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे बलाबल ६ आहे. राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी अद्यापही गट स्थापन केला नसल्याने राष्ट्रवादीच्या भूमिकेवरच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरणार आहे. राष्ट्रवादीमध्ये काही मतभिन्नता असल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपला गट अद्यापही स्थापन केला नाही. परंतु महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यासाठी हालचाली गतिमान असल्या तरी राष्ट्रवादीला अध्यक्षपद द्यावे असा दावा जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केल्याने याचा निर्णय लांबणीवर पडला असल्याची चर्चा आहे.
आमदार जयंत पाटील यांच्याकडे सध्या काँग्रेसला गृहित धरून ३० सदस्यांची ताकत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीचे मनोमिलन लांबणीवर पडले आहे. तरीसुद्धा मनोमिलनाचे गुऱ्हाळ सुरूच आहे. त्यामुळे आ. जयंत पाटील राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवण्यासाठी चाचपणी करत सत्ता स्थापनेसाठी बेरजेचे राजकारण करत आहेत. त्यामुळेच सत्तेच्या बेरजेची जुळवाजुळव करण्याची आमदार जयंत पाटील यांना चिंता लागली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडीला अद्यापही विलंब आहे. राष्ट्रवादीचे ६ सदस्य आहेत. अद्यापही राष्ट्रवादीचा गट स्थापन केलेला नाही. पाठिंबा देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे घेतील. - निशिकांत पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी.