पर्यावरण दिन विशेष: चांदोली धरणाच्या १५० एकरावरील प्रस्तावित पर्यटन केंद्राचा प्रस्ताव धूळखात
By संतोष भिसे | Updated: June 5, 2025 18:36 IST2025-06-05T18:35:34+5:302025-06-05T18:36:02+5:30
प्रशासनाची मानसिकता नाही, जमिनीवर अतिक्रमणे वाढू लागली

संग्रहित छाया
संतोष भिसे
सांगली : चांदोली धरणाच्या उभारणीनंतर अजूनही सुमारे १५० एकर जमीन वापराविना शिल्लक आहे. ती पर्यटनदृष्ट्या विकसित करावी यासाठी लोकप्रतिनिधी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र, सरकारी कार्यालयांच्या लालफितीच्या कारभारामुळे प्रस्तावाची फाइल बासनात गुंडाळली गेली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात दोन वेळा बैठका घेऊनही प्रशासन कार्यवाहीच्या मानसिकतेत नाही. शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी मात्र प्रस्तावाचा पिच्छा अद्याप पुरवला आहे. १९७८ मध्ये धरणाची उभारणी पूर्ण झाली. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जमिनीचे संपादन केले होते. काही गावे विस्थापितही केली. धरणाची उभारणी पूर्ण झाल्यानंतर काही जागेत कर्मचारी वसाहत, कार्यालये, विश्रामगृह उभारण्यात आले. त्यानंतरही १५० एकर जमीन शिल्लक आहे. त्यातील काही जागेत आता अतिक्रमणे होऊ लागली आहेत.
चांदोलीमध्ये फुलपाखरू उद्यान, मगर उद्यान आणि बरेच काही
चांदोली धरण परिसरात फुलपाखरू उद्यान, मधुमक्षिकापालन केंद्र, आकर्षक उद्यान, निरीक्षण मनोरा, रोषणाई, लेसर शो, उपाहारगृह आदी सोयी- सुविधा पर्यटनदृष्ट्या करणे शक्य आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवलेल्या प्रस्तावात यासह विविध प्रकारच्या २१ पर्यटन प्रकल्पांचा उल्लेख आहे; पण हा प्रस्ताव धूळखात पडला आहे.
क्रोक्रोडाइल पार्कचा ड्रीम प्रोजेक्ट
आमदार जयंत पाटील यांनी जलसंपदामंत्री असताना चांदोलीमध्ये क्रोकोडाइल पार्कची थीम मांडली होती. भिलवडी ते सांगलीदरम्यान कृष्णा नदीत मोठ्या संख्येने पैदास झालेल्या काही मगरी चांदोलीमध्ये पाठवायच्या व तेथे क्रोकोडाइल पार्क विकसित करायचे, अशी ही संकल्पना होती; पण ती कागदावरही आली नाही. जयंत पाटील सत्तेतून पायउतार झाले आणि प्रशासनानेही त्यांच्या संकल्पनेला जणू काही एक प्रकारे मूठमातीच दिली.
यांची संयुक्त जबाबदारी
चांदोली धरण व परिसरात वन विभाग, महानिर्मिती, पाटबंधारे, पर्यटन यासह महसूल प्रशासनाच्या विविध माध्यमांतून कामकाज चालते. पर्यटनदृष्ट्या हा परिसर विकसित करण्यात या सर्व विभागांचा संयुक्त सहभाग महत्त्वाचा आहे; पण या विभागांनी त्यादृष्टीने कधीही विचार केल्याचे दिसत नाही.
चांदोली पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत दोन वेळा बैठका झाल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातही पाठपुरावा केला. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी गट विकास अधिकाऱ्यांना बैठकीला पाठवून औपचारिकता पूर्ण केली; पण येथे पर्यटन केंद्र निर्माण करण्याची प्रामाणिक मानसिकता जिल्हा प्रशासनात नाही. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत. -शिवाजीराव नाईक, माजी आमदार, शिराळा