अवकाळी पावसाच्या दणक्याने डाळिंब फुटू लागल

By Admin | Updated: November 21, 2014 00:28 IST2014-11-20T22:32:10+5:302014-11-21T00:28:13+5:30

बागा धोक्यात : उत्पादकांना मोठा फटका; मशागतीचा खर्चही निघणे मुश्किले

Due to the sudden rain, the pomegranate fits | अवकाळी पावसाच्या दणक्याने डाळिंब फुटू लागल

अवकाळी पावसाच्या दणक्याने डाळिंब फुटू लागल

दरीबडची : रिमझिम पाऊस, ढगाळ हवामान, वातावरणातील बदल यामुळे जत तालुक्यातील डाळिंब बागांवर गंभीर परिणाम होऊ लागला आहे. पावसाच्या पाण्यामुळे बागेतील झाडांना फळे लागली आहेत, तर सध्या बागेचा हंगाम धरलेल्या, लहान फळ असलेल्या बागांवर चिक्की, बिब्या (तेल्या डाग) रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. महागडी औषधे, रासायनिक खते, मशागतीचा लाखो रुपयांचा खर्च केला आहे. अवकाळी पावसामुळे डाळिंब बागायतदारांना लाखो रुपयांचा फटका बसणार आहे.
तालुक्यामध्ये डाळिंबाचे क्षेत्र ९ हजार ३४४.५९ हेक्टर आहे. कमी पाण्यात, अनुकूल हवामान, खडकाळ जमिनीवर येणारे फळबागेचे हे पीक असल्याने शेतकऱ्यांनी १00 टक्के फळबाग अनुदान योजनेतून ठिबक सिंचनच्या साहाय्याने उजाड माळरानावर बागा फुलविल्या आहेत. गणेश, केशर जातीच्या बागा आहेत. दरीबडची, काशिलिंगवाडी, सोन्याळ, जाडरबोबलाद, आसंगी, उमदी, जालिहाळ खुर्द, दरीकोणूर येथील शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचे डाळिंब उत्पादन केले आहे. इतर फळबागांपेक्षा कमी मशागतीच्या खर्चामध्ये, कमी कष्टामध्ये उत्पादन येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी या बागा फुलविल्या आहेत. आर्थिक फायदाही चांगला आहे.
अनुकूल हवामानामुळे बागा चांगल्या बहरल्या आहेत. बिब्ब्या रोगाचा अपवाद वगळता दरीबडची येथील बागा चांगल्या आहेत. सध्या बागेतील फळे परिपक्व झालेली आहेत. पण या फळबागांना अवकाळी पावसाचा परिणाम होऊ लागला आहे. रिमझिम पावसामुळे बागांना पाणी जादा होते. पाण्यामुळे फळातील दाणे फुटतात, फळांचे कवच टणक असल्यामुळे फळ फुटते. तसेच उन्हामुळेही फळांचे कवच जास्त टणक बनलेले असते. त्यामुळे मध्यम, अपरिपक्व फळांचेही दाणे पाण्याने फुटून पडतात. त्याचा फोठा फटका बागांना बसू लागला आहे.
फळबागायतदार शेतकरी फळे फुटू नयेत म्हणून फळावरील कवच पातळ होण्यासाठी बावीस्टिन, बायोझॅम या औषधांची फवारणी घेऊ लागला आहे. ढगाळ हवामान, रिमझिम पावसामुळे सप्टेंबर, आॅक्टोबरमध्ये फळधारणा झालेल्या बागांवर बिब्ब्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सध्याचे हवामान अनुकूल असल्यामुळे बिब्ब्या रोगाची लागण वेगाने होत आहे. पाने, फुले, फळावर रोग पडू लागला आहे. पावसामुळे औषधाची फवारणी घेता येत नाही. संपूर्ण बागेचा हंगामच वाया जाणार आहे. खते, महागडी औषधे, मशागतीचा खर्च, मोठा झाला आहे. लागवड खर्चसुध्दा निघणार नाही, अशी परिस्थिती आहे. (वार्ताहर)

अंतिम टप्प्यात असलेल्या बागांवर रिमझिम पावसाने फळे फुटू लागली आहेत. फळांना पाणी जास्त होत असल्याने फळांना तडा जातो. लहान असलेल्या बागांवर बिब्ब्या पडू लागला आहे. पावसाने डाळिंबाचे नुकसान झाले आहे.
- आप्पासाहेब चिकाटी
डाळिंब उत्पादक शेतकरी

व्यापाऱ्यांनी दर पाडला
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये केशरचा दर ८0 ते ८५ रुपये, तर गणेशचा ५0 ते ५५ रुपये होता. दिल्ली, बेंगलोर, विजयवाडा, चेन्नई, मदुराई, नागपूर याठिकाणी पावसाचे कारण दाखवून डाळिंबाचा दर कमी केला आहे. केशर प्रतिकिलो ७0 ते ७५, गणेश ४0 ते ४५ रुपये दराने घेतला जात आहे.

Web Title: Due to the sudden rain, the pomegranate fits