Sangli ZP: भाजपच्या पराभवाची कहाणी: मित्रत्त्वाचे हात सुटले..सत्तेचे दोर तुटले
By अविनाश कोळी | Updated: March 21, 2026 19:32 IST2026-03-21T19:31:50+5:302026-03-21T19:32:20+5:30
एकत्र असूनही दुरावा कायम

Sangli ZP: भाजपच्या पराभवाची कहाणी: मित्रत्त्वाचे हात सुटले..सत्तेचे दोर तुटले
अविनाश कोळी
सांगली : ताकदीच्या अतिआत्मविश्वासावर दुसऱ्याला दुर्बल लेखणे महागात पडू शकते, हा बोध देणाऱ्या बिरबलाच्या एका कथेला साजेसा प्रसंग बुधवारी जिल्हा परिषदेत घडला. निवडणुकीपूर्वी युतीच्या चर्चा करताना भाजपने ज्या मित्रपक्षांना झिडकारले, त्याच मित्रपक्षांनी भाजपच्या सहज हातात आलेले सत्तेचे दोर कापले. अनेक धुरंदर नेते भाजपच्या ताफ्यात असतानाही त्यांना डोळ्यासमोर सत्तेच्या सिंहासनावर विरोधक विराजमान होताना पाहावे लागले. दुसरीकडे बेरजेच्या कुशल रणनीतीच्या जोरावर महाविकास आघाडीला सत्तेचा सोपान चढण्यात यश मिळाले.
सुरुवातीला विभक्त व्हायचे अन् नंतर संसारात नांदविण्यासाठी दबावतंत्राचा वापर करायचा, असा प्रकार भाजपने वारंवार केला. नगरपालिका, महापालिका अन् जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने शिंदेसेना व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला जागावाटपात जमत नाही म्हणून बाजुला केले. जे पक्ष कमी जागा मागतील त्यांनाच सोबत घेऊन लढायचे अन् एकहाती सत्ता मिळवायची, हे सूत्र भाजपने अंगीकारले होते. याच सुत्राने मित्रांच्या नाराजीत भर टाकण्याचे काम केले. नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपला फार मोठे यश मिळाले नाही.
महापालिका निवडणुकीत काठावरचे बहुमत मिळविताना त्यांना मित्रपक्षांची साथ घ्यावी लागली. जिल्हा परिषदेच्या निवडणूक नियोजनावेळी भाजपने पुन्हा तोच कित्ता गिरवला. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष, शिंदेसेनेला फारसे महत्त्व दिले नाही. जास्त जागांची मागणी होऊ लागल्यानंतर त्यांनी मैत्रीचे दोर तोडले. निकालात जागा घटल्यानंतर पुन्हा त्याच मित्रांच्या ताकदीवर सत्तेचे स्वप्न भाजपने रंगविले. पुरेपूर दबावतंत्र वापरले गेले. पण, सत्तेचे दोर त्यांच्या हातून निसटलेच. धुरंदर भाजपला चितपट करीत महाविकास आघाडी सिकंदर बनली.
जिल्हा परिषदेत धुरंदर पार्ट २...
मिरज पंचायत समितीमध्ये महायुतीच्या मित्रपक्षांचे बहुमत असतानाही याठिकाणी मित्रपक्षांनी आपणच धुरंदर असल्याचे स्पष्ट करीत साथ सोडल्याने भाजपच्या हातून सत्ता गेली. जिल्हा परिषदेत याच कथानकाचा सिक्वल दाखवत महाविकास आघाडीने भाजपला पराभूत केले. धुरंदरचा हा पार्ट २ सध्या राजकीय पटलावर गाजत आहे. यात राष्ट्रवादी (शरद पवार)चे नेते आमदार जयंत पाटील यांच्या भूमिकेची चर्चा सर्वाधिक आहे.
काँग्रेसचे खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप या नेत्यांच्या कसदार भूमिकांनीही कथानकात रंग भरला. रहस्यमयी भूमिका वठविणारे शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर व राष्ट्रवादी (अजित पवार)चे माजी खासदार संजयकाका पाटीलही भाव खावून गेले. मुख्य भूमिकेत असूनही भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भूमिका मात्र, झाकोळल्या गेल्या.
राग दबलेला, उफाळून आला
निवडणुकीच्या रणांगणात स्वतंत्र लढणाऱ्या मित्रपक्षांनी मैत्रिपूर्ण लढत करायची असते, हे तत्त्व महायुतीतल्या नेत्यांनी पाळले नाही. खानापूर, आटपाडीत जहरी टीकांनी सुरू झालेला शिंदेसेना - भाजपमधील रणसंग्राम दगडफेकीपर्यंत गेला. जत, तासगाव, कवठेमहांकाळमध्ये भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातील गेल्या काही महिन्यांपासून धुमसत असलेली आग निकालानंतर पेटली. वैर पक्षाशी नसून स्थानिक नेत्यांच्या भूमिकांशी आहे, असे स्पष्ट करीत मित्रपक्षांनी भाजपची साथ सोडली.
एकत्र असूनही दुरावा कायम
राष्ट्रवादी (अजित पवार)चे नेते संजयकाका पाटील तसेच शिंदेसेनेचे नेते आमदार सुहास बाबर हे औपचारिकता म्हणून भाजपसोबत असले तरीही त्यांच्यातील दुरावा कमी झालेला नाही. आता विचारमंथनाच्या भविष्यातील बैठकीत यावर कोण चिंतन करणार का, असा सवाल महायुतीत घुमत आहे.