वादळानं घरं उद्ध्वस्त... मदतीअभावी सांगली जिल्ह्यातील ७९४ कुटुंबं अद्याप उघड्यावर !
By अशोक डोंबाळे | Updated: May 11, 2026 18:20 IST2026-05-11T18:19:52+5:302026-05-11T18:20:25+5:30
दोन वर्षांपासून भरपाई रखडली : ३२ लाखांचा निधी शासन दरबारीच अडकला

वादळानं घरं उद्ध्वस्त... मदतीअभावी सांगली जिल्ह्यातील ७९४ कुटुंबं अद्याप उघड्यावर !
अशोक डोंबाळे
सांगली : जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने २०२४ मध्ये जिल्ह्यातील शेकडो कुटुंबांचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त केला. कुणाच्या घरांची पत्रे उडाली, तर कुणाच्या भिंती कोसळल्या. नैसर्गिक आपत्तीने ७९४ कुटुंबांचे आयुष्य उघड्यावर आणले; मात्र जखमेवर फुंकर घालणारी शासनाची मदतही अद्याप मिळालेली नाही. दोन वर्षांपासून नागरिक शासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजवत आहेत; पण मदतीचा ३२ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा निधी अद्याप शासन दरबारीच अडकून पडला आहे.
दि. १ एप्रिल ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत मिरज, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ, वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव, खानापूर आणि जत तालुक्यांत वादळी पावसाने मोठे नुकसान केले. प्रशासनाने पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठवला. जिल्हाधिकारी कार्यालयाने ३२ लाख ३१ हजार ५०० रुपयांच्या निधीची मागणीही शासनाकडे केली; मात्र दोन वर्षे उलटूनही मदत मिळालेली नाही. शासनाकडून मदत मिळेल, या आशेवर अनेकांनी कर्ज काढून घरांची डागडुजी केली. आता मदत नाही आणि कर्जाचा बोजा मात्र वाढत चालला आहे. त्यामुळे आपत्तीच्या जखमेवर आर्थिक विवंचनेचे चटके बसत असल्याची भावना लाभार्थी व्यक्त करत आहेत.
आटपाडीतील शिवाजी माने म्हणाले, “घर पडल्यावर मदतीच्या आशेवर कर्ज काढून दुरुस्ती केली. पण दोन वर्षे झाली तरी शासनाकडून एक रुपयाची मदत मिळालेली नाही. आता कर्जाची रक्कम दुप्पट झाली आहे.”
लालफितीच्या कारभारात सामान्यांची फरपट
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या ७९४ कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले; मात्र मदतीचा प्रस्ताव शासकीय लालफितीत अडकून पडला आहे. विशेष म्हणजे त्यानंतर २०२५ आणि २०२६ मधील आपत्तीग्रस्तांना भरपाई मिळाली; पण २०२४ मधील लाभार्थी अजूनही प्रतीक्षेत आहेत. शासनाच्या या दिरंगाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना मानसिक आणि आर्थिक फटका बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
असे झाले होते नुकसान
नुकसानीचा प्रकार / कुटुंब संख्या / मागणी केलेले अनुदान
पक्की घरे / ६७ / ४,३५,५००
कच्ची घरे / ६०५ / २४,२०,०००
पशुधन गोठे / १२० / ३,६०,०००
झोपड्या / २ / १६,०००
एकूण / ७९४ / ३२,३१,५००
लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष
भरपाई मिळावी यासाठी अनेक लाभार्थ्यांनी आमदार, खासदारांकडे तक्रारी केल्या. मात्र, दोन वर्षे उलटूनही कोणतीही ठोस मदत न मिळाल्याने नागरिकांनी लोकप्रतिनिधींवरही नाराजी व्यक्त केली आहे. “निवडणुकीवेळी आश्वासने दिली जातात; पण संकटाच्या काळात कुणीही सोबत उभे राहत नाही,” अशी भावना लाभार्थ्यांमध्ये आहे.
“दोन वर्षांपासून कुटुंबांना मदत मिळाली नाही, ही गंभीर बाब आहे. कुणाच्या चुकीमुळे जिल्ह्यातील ७९४ कुटुंबे मदतीपासून वंचित राहिली, याची चौकशी झाली पाहिजे. शासनाकडे लेखी तक्रार करून लाभार्थ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.” - सत्यजित देशमुख, आमदार, शिराळा.