मतदान न केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण, भाजप तालुकाध्यक्षांसह पाच जणांवर गुन्हा दाखल; रत्नागिरी जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 15:34 IST2026-02-13T15:32:55+5:302026-02-13T15:34:54+5:30
देवरूख पोलिस स्थानकात गुन्हा दाखल

मतदान न केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण, भाजप तालुकाध्यक्षांसह पाच जणांवर गुन्हा दाखल; रत्नागिरी जिल्ह्यातील घटना
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील गोठणे पुर्नवसन येथील तरुणाने निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान न केल्याचा रागापोटी त्या तरुणाला मारहाण केल्याची घटना मंगळवारी (१० रोजी) हातीव येथे घडली. याप्रकरणी भाजप तालुकाध्यक्ष रुपेश कदम, हातीव गावचे सरपंच नंदकुमार कदम यांच्यासह ५ जणांवर देवरूख पोलिस स्थानकात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुनील शामराव पवार (वय २९, रा. गोठणे पुनर्वसन) यांनी देवरूख पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रुपेश कदम, नंदकुमार कदम (दोघेही रा. हातीव), अक्षय शिंदे, अमित रेवाळे (दाेघेही रा. आंगवली), प्रथमेश धामणस्कर (रा. देवरूख) यांच्यासह चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील पवार व त्यांचे मित्र अंकुश उंडे, नीलेश पवार हे जेवण करण्यासाठी १० रोजी रात्री ८:३० वाजता हातीव येथील हाॅटेलमध्ये गेले होते. सुनील पवार यांचे गावातील मित्र प्रकाश उंडे यांनी निवडणुकीत मदत न केलेले माझे मित्र हॉटेलमध्ये असल्याचे रूपेश कदम यांना दूरध्वनीवरून सांगितले.
भाजपला निवडणुकीत मतदान न केल्याचा राग नंदकुमार कदम, रूपेश कदम, अक्षय शिंदे, अमित रेवाळे, प्रथमेश धामणस्कर यांनी मनात धरून सुनील पवार व त्यांच्या मित्रांच्या अंगावरून धावून जात शिवीगाळ करत मारहाण केल्याचे सुनील पवार याने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणी महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९३१ चे कलम ३७ (१) (३) यांचा मनाई आदेश असताना उल्लंघन केल्याप्रकरणी मारहाण करणाऱ्यांवर देवरुख पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक तपास देवरुखचे पोलिस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस फौजदार श्रीकांत जाधव करीत आहेत.