Ratnagiri Crime: मुलाला विषारी द्रव्य पाजून मारले, वडिलांची तक्रार; पत्नीसह दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 16:44 IST2025-10-21T16:43:32+5:302025-10-21T16:44:03+5:30
आजारपणात मृत्यू झाल्याचा बनाव

Ratnagiri Crime: मुलाला विषारी द्रव्य पाजून मारले, वडिलांची तक्रार; पत्नीसह दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
रत्नागिरी : उत्तर प्रदेश येथून कामानिमित्त रत्नागिरीत दाखल झालेल्या पत्नीने पतीला विषारी पदार्थ पाजून मारल्याची तक्रार मुलाच्या वडिलांनी केली आहे. ही तक्रार झीरो नंबरने रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात दाखल झाली असून, संशयित पत्नीसह दोघांविरुद्ध ग्रामीण पोलिस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक महिला, मनीराम कल्लूराम (वय ४५), मनीराम यांची पत्नी (नाव माहीत नाही. वय ४०, रा. बरसोला कला, तिकोनियॉ, जिल्हा खिरी, उत्तर प्रदेश) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना २० जून २०२५ राेजी जाकादेवी (ता. रत्नागिरी) येथे घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीराम श्रीपाल निवास (वय ४५, रा. बरसोला कला, तिकोनियॉ, जिल्हा खीरी, उत्तर प्रदेश) यांचा मुलगा भानुप्रताप रामनिवास याचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांची सून भांडखोर स्वभावाची होती. ती भानुप्रताप याच्याशी नेहमी भांडत असे.
संशयित मनीराम कल्लुराम यांच्या सांगण्यावरून भानुप्रताप व त्याची पत्नी असे दोघे कामासाठी रत्नागिरीला आले होते. त्यानंतर श्रीराम निवास यांनी संशयित मनीराम याला वारंवार फोन करून मुलाची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुनेने आपल्या पतीबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.
दरम्यान, २० जून २०२५ राेजी संशयित मनिराम याने फिर्यादी श्रीराम निवास यांना फोन करून कळविले की, त्यांचा मुलगा आजारपणामुळे मरण पावला. या घटनेनंतर संशयित तिघांनी भानुप्रताप रामनिवास याला विषारी पदार्थ पाजून मारले आहे, असा संशय व्यक्त करून २३ जून २०२५ ला तिकोनियॉ पोलिस स्थानकात तक्रार दिली. या तक्रारीवरून तेथील पोलिसांनी संशयितांविरुद्ध तिकोनियॉ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला.
या तक्रारीचे झीरो नंबरने कागदपत्र शनिवारी (१८ ऑक्टाेबर) रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकाला मिळाले. यावरून ग्रामीण पोलिसांनी संशयित तिघांवर १९ ऑक्टाेबर राेजी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलिस स्थानकाचे अंमलदार करीत आहेत.
तक्रारीचे भाषांतर करून नोंद
उत्तर प्रदेश येथील तिकाेनियाॅ पाेलिस स्थानकात दिलेली तक्रार हिंदी भाषेमध्ये आहे. १६ ऑक्टाेबर २०२५ च्या पत्रानुसार ही तक्रार मिळाल्यानंतर त्याचे अवलाेकन करण्यात आले. त्यानंतर तक्रारीचे मराठीमध्ये भाषांतर करण्यात आले. त्यानंतर पाेलिसांनी तक्रार नोंदवून घेतली.