मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांना दिलासा

By Admin | Updated: March 26, 2015 00:13 IST2015-03-25T21:35:07+5:302015-03-26T00:13:33+5:30

शासनाला जाग : सेवेत असताना शिक्षकांचा मृत्यू

Relieves family members of dead teachers | मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांना दिलासा

मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांना दिलासा

आनंद त्रिपाठी -वाटूळ सेवेत असताना मृत पावलेल्या राज्यातील शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना अखेर दिलासा मिळाला असून, ५ वर्षाच्या पाठपुराव्यानंतर राज्यातील ६८६ कुटुंबियांना ४ कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे. तातडीने ही रक्कम शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून वितरित करण्यात येणार असल्याचे शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी सांगितले.यासंर्दभात शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष व शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी ४ फेब्रुवारी २०१५ रोजी राज्याचे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांची भेट घेऊन मयत शिक्षकांच्या कुटुंबियांना तातडीने मदत करण्याची विनंती केली होती. मागील ५ वर्षांपासून निधी अभावी ही मदत मिळाली नव्हती.अनुदानित संस्थांमधील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतरांचा सेवेत असताना दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ६० हजार रुपयांची विशेष आर्थिक मदत केली जाते. तथापि वित्त विभागाकडून योग्य प्रमाणात तरतूद न झाल्याने राज्यातील मदत झालेल्या शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कुटुंबियांना या लाभापासून वंचित राहवे लागले होते. शासनाच्या नियोजनशून्य अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे मृत शिक्षकांच्या कुटुंबियांना मदत मिळण्यास विलंब होत होता. या विरोधात तातडीने कार्यवाही न झाल्यास शासनाच्या विरोधात भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा आमदार रामनाथ मोते यांनी दिला होता.

विशेष आर्थिक मदत
रत्नागिरी जिल्ह्यातील १० कुटुंबीयांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला असून, पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ६० हजाराची विशेष आर्थिक मदत मयतांच्या वारसाला मिळणार आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून लवकरात लवकर ही मदत मिळवण्यासाठी संघटना कटीबद्ध असेल.
- रमेश जाधव, अध्यक्ष,
जिल्हा शिक्षक परिषद

Web Title: Relieves family members of dead teachers