नितेश राणे भाजपचे रत्नागिरी संपर्कमंत्री, भाजप संघटन बळकट होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 15:45 IST2025-02-05T15:45:15+5:302025-02-05T15:45:34+5:30

ज्या जिल्ह्यात भाजपचा आमदार किंवा मंत्री नाही त्या जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून भाजपने आपल्या मंत्र्यांवर त्या जिल्ह्याची जबाबदारी सोपविली

Nitesh Rane is BJP Ratnagiri Communications Minister | नितेश राणे भाजपचे रत्नागिरी संपर्कमंत्री, भाजप संघटन बळकट होणार

नितेश राणे भाजपचे रत्नागिरी संपर्कमंत्री, भाजप संघटन बळकट होणार

कणकवली : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांना भारतीय जनता पक्षाने नवीन जबाबदारी दिली आहे. त्यांना रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री केले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप संघटन अधिक बळकट होण्यास चालना मिळणार आहे.

भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राष्ट्रीय सदस्यता अभियान अंतर्गत मंगळवारी ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृह, मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील मंत्री, आमदार आणि प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी राज्यातील भाजपच्या संपर्क मंत्र्यांची घोषणा करण्यात आली. ज्या जिल्ह्यात भाजपचा आमदार किंवा मंत्री नाही त्या जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून भाजपने आपल्या मंत्र्यांवर त्या जिल्ह्याची जबाबदारी सोपविली आहे. त्यानुसार राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून पक्षाने जबाबदारी सोपवली आहे.

मिरकरवाडा येथील अतिक्रमण १५ दिवसांत हटविले

मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास विभागाचे मंत्रिपद स्वीकारल्यानंतर प्रथमच रत्नागिरीत आलेल्या मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरी शहरानजीक असलेल्या मिरकरवाडा बंदरातील वर्षानुवर्षे असलेले अतिक्रमण अवघ्या १५ दिवसांत हटविले. त्यांनी केलेली ही धडक कारवाई अद्याप चर्चेत असतानाच आता पक्षाने या जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून त्यांच्यावर नवी जबाबदारी सोपविली आहे.

रत्नागिरी जिल्हा भाजपकडून जोरदार स्वागत

रत्नागिरी जिल्ह्यात भाजपच्या विचारांचे मतदार असतानाही आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर आवश्यक ती पकड नाही. त्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्यासारखे आक्रमक नेतृत्व आवश्यक असल्यानेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने ही रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी नितेश राणे यांच्याकडे सोपविली असून, जिल्हा भाजपकडून या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.

Web Title: Nitesh Rane is BJP Ratnagiri Communications Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.