साकवासाठी नव्याने शीर्षक, पाचही जिल्ह्यांत लवकरच कामे होतील; मंत्री योगेश कदम यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 17:08 IST2026-03-17T17:07:17+5:302026-03-17T17:08:09+5:30
ग्रामपंचायतींकडून मागविली यादी

संग्रहित छाया
रत्नागिरी : राज्यात केवळ कोकणासाठी साकव ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. मात्र, त्यासाठी राज्य सरकारकडे खर्चाची तरतूद करण्यासाठी शीर्षक (हेड) उपलब्ध नव्हते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे शीर्षक तयार करण्याची घोषणा केली आहे. त्या माध्यमातून पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यांत साकव उभारणी आणि साकव दुरुस्तीसाठी निधी दिला जाईल, अशी माहिती ग्रामविकास खात्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.
साकवांमुळे अनेक वाड्या मुख्य गावाशी, तालुक्याशी जोडल्या जातात. ही स्थिती कोकणातच आहे. त्यामुळे त्यासाठी निधी खर्च करण्यासाठी तसे शीर्षक नव्हते. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनच आतापर्यंत ही कामे केली जात होती. आपण ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी नवे शीर्षक तयार करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता या कामासाठी सरकारकडून निधी मिळेल, असे राज्यमंत्री कदम यांनी सांगितले.
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींशी संपर्क साधून त्यांच्याकडून साकव दुरुस्ती आणि नवे साकव याबाबतची यादी मागविण्यात आली आहे. त्यानुसार राज्य सरकारकडून सर्व भागांना निधी दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.