भूवैज्ञानिक सर्वेक्षणची गरज

By Admin | Updated: July 22, 2015 23:57 IST2015-07-22T22:20:07+5:302015-07-22T23:57:40+5:30

डोंगर खचला : टिकेत भूस्खलन होण्याची भीती

Need for Geological Survey | भूवैज्ञानिक सर्वेक्षणची गरज

भूवैज्ञानिक सर्वेक्षणची गरज

रत्नागिरी : तालुक्यातील टिके -फुटकवाडी येथेही डोंगर खचू लागल्याने संततधार पाऊस पडल्यास या भागाचे भूस्खलन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शास्त्रीयमाहिती प्राप्त होण्यासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण होणे गरजेचे असल्याचा अहवाल येथील भूजल आणि विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकांकडून जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे.
टिके - फुटकवाडी येथे डोंगर खचू लागल्याने या वाडीतील दहा घरांना धोका निर्माण झाला असून, त्यापैकी तीन घरांना अधिक धोका असल्याने त्यांना स्थलांतराची सूचना देण्यात आली आहे. एका बाजुला कोकण रेल्वेच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह बदलला असून, दुसरीकडे डोंगराकडून येणाऱ्या पाण्यामुळे जमीन भुसभुशीत झाली आहे. याबाबत भूजल आणि विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकांना बोलावण्यात आले होते. त्यांनी पाहणी केल्यानंतर निरीक्षणाच्या आधारे संततधार ढगफुटीसारखा पाऊस पडल्यास या भागाचे भूस्खलन होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या भूस्खलनाची आगाऊ माहिती होण्यासाठी अतिपर्जन्य काळात विशिष्ट अवधीनंतर नियमित रितीने पाहणी करून भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण होण्याची गरज आपल्या अहवालात व्यक्त केली आहे. हा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे.
त्यामुळे आता यासाठी भारतीय भूवैज्ञानिकांकडून सर्वेक्षण होण्याची प्रतीक्षा केली जात आहे. (प्रतिनिधी)

1टिके येथील हा डोंगर हळूहळू खचत आहे. मोठ्या पावसात हा डोंगर अचानक खाली आल्यास वाडीतील दहा घरांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
2दहा घरांपैकी तीन घरांना तर सर्वाधिक धोका संभवत असल्याने त्यांना स्थलांतराची सूचना देण्यात आली आहे. मोठा पाऊस झाल्यास या तिन्ही घरांना घरे खाली करावी लागणार आहेत.
3याठिकाणी भूवैज्ञानिकांनी पाहणी केली असून, त्यांनीही भूस्खलनाचा या भागात धोका असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Need for Geological Survey