Ratnagiri: राजापुरात पूरस्थिती; अर्जुना, कोदवली नद्यांनी ओलांडली इशारा पातळी, पहिल्याच दिवशीच शाळांना सुट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 12:21 IST2025-06-16T12:21:06+5:302025-06-16T12:21:41+5:30
पुराचे पाणी जवाहर चौकापर्यंत, संततधारेने जनजीवन विस्कळीत

Ratnagiri: राजापुरात पूरस्थिती; अर्जुना, कोदवली नद्यांनी ओलांडली इशारा पातळी, पहिल्याच दिवशीच शाळांना सुट्टी
विनोद पवार
राजापूर : गेले चार दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे अर्जुना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. अर्जुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोदवली व अर्जुना नदीच्या पाण्याने जवाहर चौकात धडक दिली. आज, सोमवारी सकाळी अचानक राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेडा पडल्याने व्यापारी व नागरिकांची एकच तारांबळ उडाली. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गत आठवड्यापासून पावसाने राजापूर तालुक्याला चांगलेच झोडपले. शहरासह ग्रामीण भागातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतूक बंद झाली आहे. शहरातून शीळ गोठणे भागाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला असुन वाहतुक ठप्प झाली आहे. चिंचबाध, गुजराळी, आंबेवाडी, धोपेश्वर या भागाकडे जाणारे रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
अनेकांच्या दुकानात पुराचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांनी माल सुरक्षित स्थळी हलवला आहे. तर सकाळपासुन एस टी वाहतुकही बंद करण्यात आली आहे. रविवारी रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे कोदवली व अर्जुना नद्यांच्या पाण्याने धोका पातळी ओलांडल्याने राजापूरचे तहसिलदार विकास गंबरे, नगर परिषदेचे मुख्य लिपिक जितेंद्र जाधव यांनी पुरस्थितीची पाहणी करुन नागरिकाना सावधानतेचा इशारा दिला आहे.
पहिल्याच दिवशी शाळांना सुट्टी
शहरात सकाळीच पुराचे पाणी शिरल्याने शहरातील शाळा प्रवेशोत्सव साजरा करुन सोडुन देण्यात आल्या आहेत.