वणव्यात होरपळून वृद्धाचा मृत्यू, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रभानवल्ली येथील दुर्देवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 15:14 IST2026-03-25T15:14:10+5:302026-03-25T15:14:25+5:30
कडकडीत उन्हामुळे गवत सुकले असल्याने वणव्याने काही वेळातच रौद्र रूप धारण केले

वणव्यात होरपळून वृद्धाचा मृत्यू, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रभानवल्ली येथील दुर्देवी घटना
लांजा : रणरणत्या उन्हामध्ये लागलेल्या वणव्यामध्ये प्रभानवल्ली (ता. लांजा) येथील ६५ वर्षीय वृद्धाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. विष्णू महादेव खेगडे असे या वृद्धाचे नाव आहे.
प्रभानवल्ली गोसावीवाडी येथील विष्णू खेगडे यांच्या मालकीच्या कटकी येथील डोंगरावरील जमिनीलगत वणवा लागला. वणवा गवतापर्यंत जाईल, या काळजीने ते दुपारी २:३० वाजण्याच्या दरम्यान घरातून बाहेर पडले. गेले अनेक दिवस पडत असलेल्या कडकडीत उन्हामुळे गवत सुकले असल्याने वणव्याने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. आपल्या जागेमध्ये वणवा येऊ नये, यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र वणवा आटोक्यात आणता आणता त्यातच होरपळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
वणवा आटोक्यात आणण्यासाठी दुपारी घरातून बाहेर पडलेले विष्णू खेगडे हे सायंकाळी ४:४५ वाजेपर्यंत घरी न आल्याने त्यांची पत्नी वनिता हिने कटकी येथे जाऊन पाहिले असता त्यांना विष्णू खेगडे जळालेल्या अवस्थेत दिसले. त्यांना मोठा धक्का बसला.
तातडीने त्यांनी वाडीतील ग्रामस्थांना यांची माहिती दिली. लांजा पोलिसांना यांची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे, हेडकॉन्स्टेबल सचिन भुजबळराव, नितेश हार्डे, सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल दिनेश आखाडे करत आहेत.