Ratnagiri: कोकण ग्रामीण विकास पर्यटन निधीवरून महायुतीत वाद पेटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 18:54 IST2025-06-12T18:53:54+5:302025-06-12T18:54:29+5:30
दापोली : तालुक्यातील कर्दे गावासाठी कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमात मंजूर १४ कोटी रुपयांवरून शिंदेसेना आणि भाजप या दोन ...

Ratnagiri: कोकण ग्रामीण विकास पर्यटन निधीवरून महायुतीत वाद पेटला
दापोली : तालुक्यातील कर्दे गावासाठी कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमात मंजूर १४ कोटी रुपयांवरून शिंदेसेना आणि भाजप या दोन सत्ताधारी पक्षांमध्ये संघर्ष उभा राहिला आहे. एका शासन अध्यादेशाचा आधार घेत भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी एकाच गावात अधिक निधी खर्च केला जात असल्याचा आक्षेप घेतला आहे. मात्र, जुन्या अध्यादेशाच्या आधारावर ते बोलत असून, नव्या अध्यादेशानुसार ते आपल्याच पक्षाच्या मंत्र्याच्या कामावर आक्षेप घेत आहेत, असा पलटवार राज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला आहे.
राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघात कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमात एकाच ठेकेदाराला दिलेल्या कामावर डॉ. नातू यांनी बोट ठेवले आहे. या योजनेच्या अध्यादेशाप्रमाणे पाच ते सहा गावांचा एक गट याप्रमाणे ३ ते ५ कोटी या मर्यादेपर्यंत कामांना मंजुरी देणे अपेक्षित आहे. मात्र, दापोली तालुक्यातील एकाच गावामध्ये १४ कोटींच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. कंत्राटदाराच्या भल्यासाठी ही कामे होत असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला असून, याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांच्या या आरोपावर राज्यमंत्री कदम यांनी पलटवार केला आहे. डॉ. नातू यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करताना ज्या अध्यादेशाचा उल्लेख केला आहे, तो २०१५ या सालातील आहे. त्यात ग्रामविकास राज्यमंत्री अध्यक्ष असा उल्लेख आहे. परंतु २०२०च्या सुधारित अध्यादेशानुसार ग्रामविकास मंत्री अध्यक्ष आहेत. त्यामुळे नातू आपल्याच मंत्र्याच्या कामावर आक्षेप घेत आहेत, असे राज्यमंत्री कदम यांनी म्हटले आहे.
ही योजना अनेक वर्षे रखडली होती. निधी खर्च होत नव्हता. आपण त्यासाठी पुढाकार घेतला. एकाचवेळी जास्त गावे घेतली तर कोणाच्याही वाट्याला पुरेशी रक्कम येणार नाही. त्यापेक्षा एक एक गाव विकसित करण्यावर आपला भर असल्याचे ते म्हणाले.
निधीचा गैरवापर नाही
- मंजूर झालेल्या १४ कोटी निधीचा कुठेही दुरुपयोग होणार नाही. मात्र, आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करण्याअगोदर नातू यांनी आपल्याशी संवाद साधला असता तर विषय वाढला नसता.
- पहिल्यांदाच समुद्रकिनाऱ्यावरील अनेक गाव विकसित करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. त्यात नातू यांनी आडकाठी घालू नये, असा विनंतीवजा इशारा कदम यांनी दिला आहे.