जिल्हा नियोजनच्या निधीवरून रत्नागिरीत भाजपची उघड नाराजी, माजी आमदार विनय नातू यांच्या आरोपाने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 15:25 IST2025-06-13T15:25:08+5:302025-06-13T15:25:52+5:30

आधी कदम, आता सामंत यांच्यावर टीका

BJP's open displeasure in Ratnagiri over district planning funds, former MLA Vinay Natu's allegations create a stir | जिल्हा नियोजनच्या निधीवरून रत्नागिरीत भाजपची उघड नाराजी, माजी आमदार विनय नातू यांच्या आरोपाने खळबळ

जिल्हा नियोजनच्या निधीवरून रत्नागिरीत भाजपची उघड नाराजी, माजी आमदार विनय नातू यांच्या आरोपाने खळबळ

चिपळूण : रत्नागिरी जिल्हा नियोजन मंडळाकडून २०२४-२५ या आर्थिक वर्षात राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाला. यामध्ये एक कोटी ६२ लाख रत्नागिरी, तर ३६ लाख निधी चिपळूणच्या दवाखान्याच्या दुरुस्तीसाठी देण्यात आला. उर्वरित अन्य सात तालुक्यांत एकही निधी देण्यात आला नसून, केवळ रत्नागिरी आणि राजापूरच्या कंत्राटदारांसाठी या निधीची खैरात करण्यात आल्याचा आरोप माजी आमदार व भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विनय नातू यांनी केला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील महायुतीमध्ये पुन्हा एकदा जोरदार जुंपली आहे.

खासदार नारायण राणे चिपळूणच्या दौऱ्यावर आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात निधी वाटपावरून उघडपणे नाराजी व्यक्त केली. खासदार राणे यांनी हा विषय सौम्य केला असला, तरी आता गुहागरचे माजी आमदार आणि भाजपचे डॉ. विनय नातू यांनी पालकमंत्र्यांच्या निधी वाटपावरील भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारच्या सचिव स्तरावरून या घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी नातू यांनी केली आहे.

जनावरांना तपासण्याच्या जागी पेव्हर ब्लॉक?

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत २१ कामे नियोजन मंडळाने मंजूर केली. ही सर्व कामे बांधकामाची आहेत. दवाखान्याच्या बाहेरील रिकामी जागा जनावरांना तपासण्याची असते. पण त्या ठिकाणी पेव्हर ब्लाॅक बसविले जात आहेत, असा आक्षेप डॉ. नातू यांनी घेतला आहे.

चार तालुक्यांना निधीच नाही

जुन्या इमारतीचे निर्लेखन करून नवीन बांधकामे सुरू आहेत. यामध्ये दवाखान्याला फाॅल सिलिंग करणे हेही काम मंजूर आहे. या सर्व कामांमध्ये असे दिसून येत आहे की, ७६ लाखांची कामे रत्नागिरी तालुक्याला, ३१ लाखांची कामे राजापूरला, ४२ लाखांची कामे चिपळूण तालुक्यात, ५ लाखांची कामे संगमेश्वरात, ३ लाखांची गुहागरात, तर अन्य उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील चार तालुक्यांना निधीच नसल्याची बाब निदर्शनास आली असल्याचे डॉ. नातू यांचे म्हणणे आहे.

आधी कदम, आता सामंत यांच्यावर टीका

डॉ. नातू यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका केली आहे. कोकण ग्रामीण विकास पर्यटन निधीवरून त्यांनी राज्यमंत्री कदम यांच्यावर निशाणा साधला होता. आता जिल्हा नियोजनच्या निधीवरून त्यांनी पालकमंत्री सामंत यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीमध्ये फार काही आलबेल नसल्याचेच चित्र दिसत आहे.

Web Title: BJP's open displeasure in Ratnagiri over district planning funds, former MLA Vinay Natu's allegations create a stir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.