पेणमधील ९,४९६ शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 11:52 PM2019-11-16T23:52:26+5:302019-11-16T23:52:34+5:30

उत्पादन खर्चही निघेना : तालुक्यातील २८४०.६६ हेक्टर क्षेत्र बाधित

Famine hit 1,949 farmers in Penn | पेणमधील ९,४९६ शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका

पेणमधील ९,४९६ शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका

Next

- दत्ता म्हात्रे 

पेण : अवकाळी पावसामुळे पेण तालुक्यातील १४० गावांमधील ९,४९६ खातेदार शेतकऱ्यांच्या २८४०.६६ हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे उत्पादन मातीमोल ठरले आहे. तब्बल सात हजार १०२ एकर भातशेतीला अवकाळी पावसामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले असून शेतकरी देशोधडीला लागला आहे.

रायगड जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून नुकसानीचा अहवाल कोकण आयुक्तांना पाठविला आहे. खरीप हंगामात जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील ७९ हजार १३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तब्बल एक हजार ८१६ गावांमधील ७१ हजार १३ खातेदार शेतकºयांचे १८ कोटी, १० लाख ६२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची आकडेवारी आयुक्तांकडे अहवालातून पाठविण्यात आली आहे. शेष राहिलेल्या भातपीक उत्पादनात उत्पादन खर्चही निघणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेतकºयांचा एकरी १८ हजार ते १९ हजार रुपये उत्पादन खर्च झाला आहे. तर हातात जेमतेम तीन ते चार हजार रुपये पडणार असल्याचे झोडणी केलेल्या भातपीक उतारावरून दिसत आहे. खरिपाचे पीक हातातून गेल्याने वर्षभर मजुरी करून शेतकºयांना कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागणार आहे.

पेण तालुक्यातील आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यांत महापूर येऊन भातशेतीला पावसाचा पहिला तडाखा बसला होता. पेणच्या पश्चिमेला असलेली खारभूमी शेती पुराने पूर्ण उद्ध्वस्त झाली होती. त्यानंतर इकडून तिकडून रोपे गोळा करून लागवड केलेली भातशेती आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत आलेल्या अवकाळी पावसामुळे वाया गेली आहे. शासकीय पंचनामे पूर्ण करून जाहीर झालेल्या नुकसानीच्या आकडेवारीत पेणची १४० गावातील ९,४९६ खातेदार शेतकºयांची २८४०.६६ हेक्टर क्षेत्रावरील भातशेती नष्ट झाली आहे. आर्थिक नुकसानीची आकडेवारी एक कोटी ९३ लाख १६ हजार रुपये सरकारी अहवालात नमूद करण्यात आली आहे.

यंदा खरीपातील उत्पन्नाचा हिशोब द्यावयाचा झाल्यास ‘आमदानी अठ्ठन्नी, खर्चा रुपय्या’ असा आहे. एक एकरी भातशेती उत्पादन खर्च १८ ते १९ हजार रुपये इतका खर्च होतो. सरासरी अडीच ते तीनपट उत्पादन घेतले जाते. २१ ते २२ क्विंटल एकरी भातशेतीतून भाताचे उत्पादन घेतले जाते. एकरी ५५ ते ६० हजार रुपये वार्षिक उत्पन्न मिळते. मात्र, यंदा एकरी जेमतेम तीन ते चार क्विंटल इतकेच हाती उत्पन्न मिळत असल्याने केलेला खर्च भरून निघणार नाही.

शेती उत्पादनाचा एकरी खर्च
एक एकर शेतीला टॅक्टरद्वारे जमीन उखळणीसाठी १००० रुपये, भातपीक वाफे (राब) तयार करणे १५००, शेताचे बांध मजबुती करणे १५००, बी-बियाणे १२००, खते व कीटकनाशके २५००, तण काढणे १००० रुपये, लागवड ३०००, कापणी ३५००, बांधणी १०००, झोडणी ३०००, असे एकूण १८ ते १९ हजार एकरी खर्च येतो. मात्र, खरिपाच्या उत्पन्नाची बेगमी करून जर हातात जेमतेम पडणार असल्याने अवकाळीने खरीप हंगामाची धूळधाण उडविली आहे.

Web Title: Famine hit 1,949 farmers in Penn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.