आता कशाला उणी धुणी काढायची, काम करणे हीच दादांना श्रद्धांजली; २ राष्ट्रवादीच्या विलीणीकरणावर सुप्रिया सुळेंचे मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 15:47 IST2026-02-18T15:44:37+5:302026-02-18T15:47:10+5:30
सत्य बाहेर येण्यासाठी रोहित धडपड करत आहे, दादांचा घातपात वाटतो, म्हणूनच आम्ही पारदर्शक चौकशीची मागणी करत आहोत

आता कशाला उणी धुणी काढायची, काम करणे हीच दादांना श्रद्धांजली; २ राष्ट्रवादीच्या विलीणीकरणावर सुप्रिया सुळेंचे मत
पुणे : दोन्ही राष्ट्रावादी एकत्र येण्यासंदर्भात अजित पवार आणि माझ्यामध्ये काय बोलणे झाले होते, हे आम्हा बहिण भावाला माहिती आहे, आता माझा भाऊच गेला, मग कशाला खरे खोटे करायचे, कशाला उणी धुणी काढायची. कामाला लागणे, लोकांची कामे करणे, हीच दादांना खरी श्रद्धांजली असेल, असे मत ष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर व्यक्त केले आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
महापालिका हद्दीत समावेश झालेल्या गावांमधील विविध प्रश्नांसाठी खा. सुळे यांनी मंगळवारी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. विलीनीकरणाच्या प्रश्नावर सुळे म्हणाल्या, माझा भाऊ मोकळ्या मानाचा होता. माझा दादा गेला, ते दुःख आयुष्यभर राहील. विलीनीकरणाला तटकरे आणि पटेल आडकाठी आणतात का, असा प्रश्न विचारला असता सुळे यांनी “राम कृष्ण हरी,” अशी प्रतिक्रिया दिली.
आमदार रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, दादा रोहितचा काका होता, त्यामुळे त्याची अस्वस्थता सहाजिकच आहे. रोहित दादांच्या अपघाती मृत्यूचा अभ्यासपूर्वक पाठपुरावा करत आहे. सत्य बाहेर येण्यासाठी तो धडपड करत आहे. दादांचा घातपात वाटतो, म्हणूनच आम्ही पारदर्शक चौकशीची मागणी करत आहोत. दादांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी होऊन सत्य बाहेर येण्याची प्रत्येकजण वाट पहात आहे. हा विषय राजकारणाचा नाही, तर आमच्या घरातील कर्ता माणूस गेला आहे, आम्ही दादाला पाहूही शकलो नाही, त्यामुळे सत्य समोर येणे गरजेचे आहे. भिगवणमधील घटनेबाबत त्या म्हणाल्या, माझे पोलिस अधिक्षकांशी बोलणे झाले आहे. पीडितांना न्याय मिळाला पाहिजे. तेथे शांतता राहिली पाहिजे. हा विषय वाढणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. महाराष्ट्रात एक नवा ट्रेण्ड सुरू झाला आहे. आमचे म्हणणे आहे की हिंसा होऊ नये.
सुळे असेही म्हणाल्या,
- शरद साहेबांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात महाविकास आघाडीचे घटक पक्ष पुढील ८ ते १० दिवसात निर्णय घेतील.
- विमान अपघातासंदर्भात उद्धवसेना आणि काँग्रेसने संसदेत चर्चा केली, त्याबद्दल “धन्यवाद”.
- रिंग रोडही वेळेत पूर्ण व्हायला हवे.
- कलाकार कट्टा स्थलांतर करू नये, उलट कलाकारांसाठी मोठी जागा उपलब्ध करून द्यायला हवी.