शेतात गेला, काही क्षणांत घडला घात; ऊसफडात कुत्र्याच्या हल्ल्याने चिमुकल्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 15:30 IST2026-02-08T15:29:33+5:302026-02-08T15:30:12+5:30
वनविभागाचा खुलासा मुलाच्या जखमा वन्यप्राण्याच्या नसून कुत्र्याच्या आहेत.

शेतात गेला, काही क्षणांत घडला घात; ऊसफडात कुत्र्याच्या हल्ल्याने चिमुकल्याचा मृत्यू
नसरापूर : ऊसतोड कामगाराच्या ५ वर्षीय मुलावर कुत्र्याने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला, ही घटना केंजळ (ता. भोर) येथे उघडकीस आली. दि. ७ रोजी सकाळी नऊ वाजता ही घटना घडली. वनविभागाने वन्यप्राण्याचा हल्ला नाकारून कुत्र्यानेच हल्ला केल्याचे स्पष्ट केले आहे. चाळीसगाव येथील कृष्णा किरण सोनवणे (वय ५) हे बालक आज सकाळी आई-वडिलांसह केंजळ येथील
ऊस फडात कामासाठी गेले होते. कृष्णाला शौचास लागल्याने आई सरला सोनवणे यांनी त्याला शेताच्या बाजूला पाठवले. थोडा वेळ वाट पाहिली, मात्र कृष्णा उसाच्या शेतात रक्तबंबाळ अवस्थेत आढळला. भोर ग्रामीण रुग्णालयात नेले असता, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. केंजळ (ता. भोर) येथे खळबळजनक घटना; वन विभागाचा स्पष्ट खुलासा. राजगड पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, पालकांचा जबाब घेत तपास सुरू केला आहे. परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
वनविभागाचा खुलासा मुलाच्या जखमा वन्यप्राण्याच्या नसून कुत्र्याच्या आहेत. घटनास्थळाची पाहणी केली असता कुत्र्याचे पायाचे ठसे सापडले. उपस्थित ऊसतोड कामगारांनीही कुत्र्याचा हल्ला पाहिला, असे वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी सांगितले. वनविभाग तपास करत आहे. सदर मुलाच्या अंगावरील जखमा वन्यप्राण्याच्या नसून कुत्र्याने केल्या आहेत. आम्ही घटनास्थळाची पाहणी केली असता कुत्र्याच्या पायाचे ठसे निदर्शनास आले.
उपस्थित ऊसतोड कामगारांकडून माहिती घेतली असता त्यांनीही कुत्र्याने हल्ला केल्याचे सांगितले. बिबट्याचा किंवा इतर वन्यप्राण्याचा हल्ला झालेला नाही, असे नसरापूर वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी 'लोकमत'शी बोलताना स्पष्ट केले. वनविभाग तपास पूर्ण करून अहवाल सादर करणार आहे. या घटनेने केंजळ आणि परिसरातील शेतकरी, मजुरांमध्ये भीती व हळहळीचे वातावरण आहे. ऊस फडांभोवती कुत्रे वावरतात, मजुरांच्या मुलांसाठी हा धोका आहे. प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी करत आहेत.